
90 चे दशक हे संगीतप्रेमींसाठी सुवर्णकाळ मानले जाते. त्या काळात अनेक गाणी लोकप्रिय झाली, मात्र काही गाणी अशी होती ज्यांनी थेट लोकांच्या भावनांना स्पर्श केला. त्यापैकीच एक म्हणजे ‘अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का’ हे गाणे.
ब्रेकअप झालेल्या तरुणांच्या भावना व्यक्त करणारे हे गीत त्या काळात इतके गाजले होते की ऑटो-रिक्शापासून पानटपऱ्यांपर्यंत आणि अगदी लग्नसमारंभांमध्येही ते ऐकायला मिळत असे. सोनू निगम यांच्या भावपूर्ण आवाजामुळे आणि हृदयाला भिडणाऱ्या गीतांमुळे या गाण्याने लाखो श्रोत्यांची मने जिंकली. जवळपास तीन दशकांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून, आजही ते दुःखद आणि विरहाच्या गाण्यांमध्ये अग्रस्थानी मानले जाते.
गाण्याशी जोडली गेली होती एक सनसनाटी अफवा
या गाण्याच्या लोकप्रियतेमागे केवळ त्याचे संगीत आणि शब्द नव्हते तर त्याच्याशी संबंधित एक चर्चित अफवाही होती. अनेक वर्षे लोकांमध्ये अशी चर्चा होती की पाकिस्तानातील प्रसिद्ध गायक अत्ताउल्ला खान इसाखेलवी यांनी आपल्या प्रेयसीच्या बेवफाईमुळे संतापून तिची हत्या केली होती आणि त्या दुःखातून हे गाणे गायले होते.
ही कथा इतकी मोठ्या प्रमाणावर पसरली की अनेकांनी तिला सत्य मानले. मात्र, नंतर स्वतः अताउल्लाह खान यांनी या सर्व दाव्यांचे खंडन केले आणि ती केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या कथेला कोणताही वास्तविक आधार नसल्याचे समोर आले.
चित्रपटापेक्षा गाण्याचीच अधिक चर्चा
1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेवफा सनम’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. मात्र, चित्रपटापेक्षा त्यातील गाणीच अधिक गाजली. विशेषतः ‘अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का’ हे गाणे इतके लोकप्रिय झाले की अनेकांना आज चित्रपटाचे नाव आठवत नसले तरी या गाण्याचे बोल सहज आठवतात.
त्या काळात कॅसेट संस्कृती जोरात होती. संगीतप्रेमींच्या कॅसेट संग्रहात हे गाणे हमखास असायचे. ब्रेकअप झालेल्या तरुणांसाठी तर हे गाणं जणू त्यांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करणारे गाणं बनले होते. जवळपास 30 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता अबाधित राहिली आहे आणि ते आजही अनेकांच्या प्लेलिस्टमधील कायमचे स्थान टिकवून आहे.