
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. विशेष म्हणजे, ज्या साखरी धरणातून तालुक्यातील विविध भागांना पाणीपुरवठा केला जातो, त्याच धरणालगत असलेल्या साखरे गावातील नागरिकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
साखरे गावातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने दैनंदिन गरजांसाठीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांसह ग्रामस्थांना लांब अंतर पार करावे लागत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त ग्रामस्थांनी साखरी धरण परिसरात हंडा मोर्चा काढला. यावेळी नागरिकांनी धरणाजवळ ठिय्या आंदोलन करत आपल्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली. “धरण आमच्या गावाशेजारी असूनही आम्हालाच पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे,” अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
दरम्यान, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, नियमित पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी आणि ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. या आंदोलनामुळे डहाणू तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासन यावर काय उपाययोजना करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.