
Police recruitment Maharashtra : महाराष्ट्रातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतिक्षा आज अखेर संपणार आहे. आज मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 14 हजार पोलीसपदांच्या भरतीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय होणार आहे. अनेक महिन्यांपासून या भरतीची प्रतीक्षा करत असलेल्या हजारो तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया लांबलेली होती, ज्यामुळे उमेदवारांमध्ये मोठी नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही भरती प्रक्रिया लवकरच वेगाने सुरू होईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.
महायुती सरकार लवकरच करणार घोषणा!
हा निर्णय राज्यातील रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी मोलाचा ठरतोय. या भरतीद्वारे पोलीस दलात नव्या आणि ताज्या दमाच्या तरुणांचा समावेश होणार आहे. महायुती सरकारच्या (Mahayuti Sarkar) या घोषणेनंतर लवकरच पोलीस भरतीसंदर्भातील जाहिरातही प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील अनेक युवकांना त्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी मोठा संधी मिळणार असून, पोलीस दलाला नवीन ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या भरतीसंबंधी अधिकृत घोषणा आणि प्रक्रिया लवकरच प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे. महायुती सरकार आल्यानंतर पोलीस भरती कधी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत, भरत गोगावलेची दांडी, नाराज होऊन दिल्लीला गेल्याची चर्चा
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रत्यक्ष उपस्थित नसतील. एकनाथ शिंदे हे सध्या श्रीनगरमध्ये आहेत. त्यामुळे ते या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहतील. तर शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेही आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. रायगड जिल्ह्यात 15 ऑगस्टला ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना दिल्याने जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांना दिले जाईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे भरत गोगावले हे नाराज होऊन दिल्लीला गेल्याची चर्चा आहे. मात्र, भरत गोगावले यांनी दिल्लीत काही काम असल्याने आज मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहता येणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी नाराजीचे वृत्त फेटाळून लावले.
हे ही वाचा –
आणखी वाचा