
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने (Election commission) आज पत्रकार परिषद घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Election) घोषणा केली, त्यानुसार राज्यात 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, पुढील महिनाभरातच राजकीय पक्ष आणि उमेदवारांना सर्व रणनीती आखावी लागेल. याचदरम्यान, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी दुबार मतदान नोंदणी आणि मतदार यादीसंदर्भाने आयुक्तांना प्रश्न विचारले. मात्र, पत्रकारांच्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर आयुक्त वाघमारे यांना देता आले नाही. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही याच पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ शेअर करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
निवडणुका आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेची ही क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे, हे फक्त संविधानातच, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयुक्तांच्या उत्तरावरुन संताप व्यक्त केला आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे, दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांचं करायचं काय? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरुर पाहावी, तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल, असेही राज ठाकरे यांनी म्हटलं. तसेच, या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं त्यांनी अभिनंदन केलंय.
राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयुक्तांचे उत्तर
दरम्यान, राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून उपस्थित केलेला, सुलभ शौचालयाच्या पत्त्यावर किंवा आयुक्तांच्या बंगल्याच्या पत्त्यावर शेकडो मतदारांची नावं नोंदवण्यात आली आहेत. त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न निवडणूक आयुक्तांना विचारण्यात आला होता. त्यावर, आयुक्तांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही. निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे म्हणाले की, “मतदार यादी तयार करण्याची यंत्रणा ही वेगळी आहे. आम्ही फक्त ती यादी वापरतो. एक तारीख ठरवतो आणि त्या दिवसाची यादी मतदानाला ग्राह्य धरतो. त्याची शहानिशाही आम्हीच करतो. दुबार मतदार असतील किंवा चुकीच्या प्रभागात नाव गेलं असल्यास ते तपासतो. ज्यांची नावे ही आधीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये होती, पण आताच्या यादीत नसतील तर त्या नावांचा समावेश करतो. काही लहान-सहान दोष असतील तर ते दुरुस्त करतो.”
आम्ही कठोर भूमिका घेऊ – संदीप देशपांडे
ज्या पद्धतीने आज निवडणूक आयोगाने डाव साधला, तो अंत्यत चुकीचा आहे. कोणाचा दबाव आहे तुम्हाला, तुम्ही दुबार मतदार कसा थांबवणार आहात. हे लोकशाहीला घातक आहे. निवडणूक पारदर्शक होणार कशी? बोगस मतदार यादीबाबत तुम्ही काय करता? असे सवाल मनसेच सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आयोगाला विचारले आहेत. तसेच, जिथे निवडणुकीत बोगस मतदार दिसतील तिथे आम्ही कठोर भूमिका घेऊ, असेही त्यांनी म्हटले.
रोहित पवारांनी व्यक्त केला संताप, विचारले प्रश्न
निवडणूक आयुक्तांनी विधानसभेच्या दुबार मतदारांवर बोलताना संगितले की “मी लोकसभा, विधानसभेच्या दुबार मतदारांबाबत कमेंट करणार नाही ?”. निवडणूक आयुक्तच कमेंट करणार नसतील तर मग तत्कालीन अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी तरी विधानसभेतील दुबार मतदारांवर कमेंट करतील का? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे. तसेच, आयुक्तांनी कमेंट करण्यास नकार दिला असला तरी त्यांनी किमान आम्ही इतके दिवस पुरव्यासकट दुबार मतदारांचा जो विषय लावून धरला तो मान्य तरी केला त्याबद्दल त्यांचे आभार, असा खोचक टोलाही आमदार पवार यांनी लगावला आहे.
हेही वाचा
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
आणखी वाचा