
अख्ख्या नाशिकला हादरवणारी घटना नुकतीच समोर आली आहे. सारुळच्या जंगल परिसरात अज्ञात मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. विशेष म्हणजे तिच्या मृतदेहाजवळ पिझ्झाही आढळला होता. या हत्याकांडामुळे मोठी खळबळ माजली होती. मात्र अखेर पोलिसांनी कसून तपास केला आणि या तरूणीच्या मृत्यूचं गूढ उकलण्यात त्यांना यश मिळालं आहे. नाशिकमधील सारूळच्या जंगलात सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटली असून तिच्या मारेकऱ्यांना शोधण्यातही पोलिसांना यश आलं. या खुनाप्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. ओळख पटल्यानंतर मुलीचा मृतदेह घेण्यासाठी नातलग बुलढाण्यावरून नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. या घटनेने फक्त नाशिक नव्हे तर अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी अल्पवयीन असून ती अवघ्या 16 वर्षांची असून अल्पवयीन होती. ती बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथील असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं. मात्र या 16 वर्षांच्या मुलीचा तिच्याच प्रियकराने, मित्रांच्या मदतीने खून केल्याचे पोलीस तपासत उघड झालं आणि सगळेच हादरले. दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आणखी एकाचा नाशिकच्या ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू आहे. अथर्व देशमुख आणि सुमित सानप अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोन संशयितांची नावं आहेत.
क्रूर हत्या, गळ्यात चाकू आणि पिझ्झा
नाशिकच्या ग्रामीण भागात खळबळजनक घटना घडली होती. सारुळच्या जंगल परिसरात अज्ञात मुलीचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह सापडला होता. एवढंच नव्हे तर या मृत मुलीच्या गळ्यात चाकू अडकलेला होता नाशिकच्या वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना होती. विचित्र गोष्ट म्हणजे त्या मुलीच्या मृतदेहाशेजारी पिझ्झाही ठेवलेला आढळला होता. ही मुलगी कोण, ती तिथं कशी पोहचली ? सोबत कोण होतं ? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला.
इग्नोर करतेय म्हणून केली प्रियकराने हत्या
ही मुलगी बुलढाण्याची होती. मुलीच्या आणि आरोपी मुलाच्या, घरचे दोन्ही एकमेकांच्या ओळखीचे ,मुलगा आणि मुलगी हे दोन्ही शिंदखेडा राजा येथील रहिवासी आहेत. मुलीची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याची माहिती नाशिक पोलीस अधीक्षकांकडून देण्यात आली. हत्या झालेली अल्पवयीन मुलगी ही संशयित आरोपीची मैत्रीण होती. आरोपी हा नाशिकच्या संदीप फाऊंडेशन येथे शिक्षण घेत होता, तर मुलगी अकोले येथे अकरावीत शिकत होती. ही मुलगी दुसऱ्या एका मुलाशी बोलत होती. त्यातूनच ती आपल्याला इग्नोर करते असं आरोपीला वाटू लागलं. त्याला त्यामुळे प्रचंड राग आला आणि त्यातूनच त्याने हे भयानक कृत्य केलं. बुलढाण्यावरून नाशिक कडे येतानाच त्याने मुलीची हत्या केली. नंतर तिचा मृतदेह सारूळच्या जंगलात टाकल्याचे निष्पन्न झाले. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एकाचा शोध सुरू आहे.