
अमेरिका, इस्राईल आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता भारतीय कृषी क्षेत्रालाही बसला आहे. विशेषतः महाराष्ट्रातील केळी उत्पादक या संकटाने त्रस्त झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे तब्बल 1,200 कंटेनर केळी कोल्ड स्टोअरेजमध्ये पडून आहेत. या युद्धामुळे कोट्यवधी रुपयांच्या केळीच्या मालाची निर्यात थांबली आहे.
केळी उत्पादकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन दिवसांपासून केळीची काढणी पूर्णपणे बंद झाली आहे. जिथे दररोज हजार ते बाराशे टन केळीची काढणी केली जात होती, तिथे आता पूर्णपणे थांबली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. केवळ काढणीच नाही तर, निर्यात केलेले कंटेनरही अडचणीत सापडले आहेत. पुढे पाठवलेले अनेक कंटेनर परत येऊ लागले आहेत, तर काही इराणसारख्या ठिकाणी पोहोचलेले कंटेनरही माघारी बोलावले जात आहेत. जहाजे उपलब्ध नसल्यामुळे कोल्ड स्टोअरेजमध्ये आलेला मालही खाली करून घेण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे केळी उत्पादकांचे मोठे नुकसान होत असून, त्यांच्या समोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.