
छगन भुजबळ, अशोक खरातImage Credit source: टीव्ही ९ मराठी
Chhagan Bhujbal on Ashok Kharat: भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्या कुकर्माने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. अध्यात्माचा आधार घेत त्याने केलेल्या कुकृत्याने समाजमन हादरले आहेत. त्याने अनेक भाविक महिलांचे लैंगिक छळच नाही तर शोषण केले. दडपशाहीचा वापर करत जमिनी हडपल्या. राज्यातूनच नाही तर देशभरातून अनेक नेते त्याच्या कृपाशिर्वाद घेण्यासाठी येत असल्याचे दिसून आले आहे. पण नाशिकमध्ये असूनही छगन भुजबळ या भोंदू ज्योतिषी अशोक खरातपासून चार हात लांब कसे याचे आश्चर्य अनेकांना वाटले. याविषयीच्या प्रश्नाला स्वतः छगन भुजबळ यांनीच उत्तर दिले आहे. खरात सारख्या प्रवृत्तीशी संबंध ठेवूच नये. तर सार्वजनिक जीवनात वावरताना मर्यादा पाळणे आवश्यक असल्याचा सल्ला त्यांनी दिला.
खरातला भेटण्याचा सल्ला, भुजबळांनी केले काय?
अशोक खरात याच्यावरील कारवाईविषयी आपल्याला बातम्यातून कळाल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिले. मी बातम्यातून देखील वाचत आहे. मला काही त्यांच्या बाबत फार माहिती नाही. माझे लोक देखील सांगत होते तिकडे जाऊ पण मी काही गेलो नाही. अंधश्रद्धा पासून दूर राहिले पाहिजे हे माझं मत आहे असा स्पष्टपणे भुजबळांनी सांगितले. काही चांगले साधू देखील आहेत ते चांगले काम करत आहेत, असेही भुजबळ म्हणाले.
राजकीय क्षेत्रात काम करताना बंधने पाळा
फार मोठे मंडळी त्यांच्याकडे येत होती. रुपाली चकणकर देखील इकडे आल्या. त्या तर पुण्याच्या आहेत. त्यांना देखील कोणीतरी सांगून आणलं असेल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी काही बंधन पाळले पाहिजे, असा मोलाचा सल्लाही भुजबळांनी राजकीय नेत्यांना दिला. पोलीस याबाबत देखील चौकशी करत आहेत कारवाई होईल. नेहमी जात असल्यामुळे चाकणकर यांना खरातने विश्वस्त केलं असेल असे भुजबळ म्हणाले. संविधानिक पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निर्णय घेतले. मात्र पक्षाच्या अध्यक्ष पदाबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेते आणि अध्यक्ष सुनेत्रा पवार घेतील. संपूर्ण चौकशी करून त्यावर निर्णय होतो अशी प्रतिक्रिया त्यांनी चाकणकरांच्या राजीनाम्याविषयी दिली.
पाणी प्रश्नावर काय दिले उत्तर
कॅप्टन खरात अध्यक्ष असलेल्या मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थान साठी दारणा धरणातून पाणी आरक्षित करण्यात आले होते. 39 लाख लिटर पाणी आरक्षित करण्याची मंजुरी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दिली होती. याविषयी छगन भुजबळ यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले. अनेक चांगले जे लोक धार्मिक क्षेत्रात काम करणारे लोक आहेत त्यांना पाणी देण्यात येते. पहिल्यांदा अशा प्रकारे निर्णय झालेला नाही. शक्य असेल तर पाणी देतो कोणीही मागितले तर पाणी देण्याचा निर्णय होतो. तो माणूस पुढे जाऊन काय करेल हे कसं त्या अधिकार्यांना कसं माहिती असणार, त्यामुळे पाणी देण्याचा निर्णय गरजेनुसार झाल्याचे त्यांनी इंगित केले.