
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्याविषयी बोलताना छत्रपती शिवाजी महारांचा उल्लेख करत एक टिप्पणी केली आहे. टिपू सुलतान यांनी कधीच विषारी, विखारी विचारांना थारा दिला नाही. त्यामुळे टिपू सुलतान यांना शौर्याच्या बाबतीत शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानले पाहिजे, असे सपकाळ म्हणाले आहेत. त्यांच्या याच विधानावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपाने केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले?
हर्षवर्धन सपकाळ माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी टिपू सुलतान यांच्याविषयी मत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्य नावाचा विचार दिलेला आहे. याच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, असे मत सपकाळ यांनी व्यक्त केले.
…शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले पाहिजे
तसेच, टिपू सुलतान हे भारताचे भूमीपूत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केलं नाही. शौर्याचं लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष म्हणून पाहिले पाहिजे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
भाजपाने नेमका काय आक्षेप घेतला?
हर्षवर्धन सपकाळ यांच्या याच विधानावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळ यांच्यावर टीका केली आहे. “खरं म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी टिपू सुलतान यासारख्या नराधमाची तुलना त्यांनी शिवाजी महाराजांशी केली आहे. ही बाब अतिशय निंदनीय आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य तयार केलं. मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त करण्याचे काम केले. खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य तयार केले. त्याच वेळी हजारो-लाखो हिंदूंची टिपू सुलतान याने हत्या केली. टिपू सुलतानची शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणे, दोघांनाही समान सन्मान द्या म्हणणे यापेक्षा जास्त लांगूलचालन मी या जन्मात पाहिले नाही,” अशी रोखठोक भूमिका फडणवीस यांनी घेतली. तसेच सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे शिवराय आमचा स्वाभिमान आहे आणि टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत होते. ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे परकीयांशी लढत होते त्यावेळी देवेंद्र… pic.twitter.com/xb4MnsBGHe
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) February 14, 2026
दरम्यान, फडणवीस यांच्या टीकेला सपकाळ यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे शिवराय आमचा स्वाभिमान आहे आणि टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत होते. ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे परकीयांशी लढत होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस ज्या संघ भाजपाच्या विचारातून येतात त्या विचारांचे लोक इंग्रजाची गुलामी आणि हेरगिरी करत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला इतिहास शिकविण्याच्या भानगडीत पडू नये. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप आणि आरएसएसच्या भगतसिंह कोश्यारी सह कुणी-कुणी काय-काय मुक्ताफळे उधळली आणि अवमान केलाय हे महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही,” असा पलटवार सपकाळ यांनी केला आहे. तसेच संविधानाच्या मूळ प्रतिवर शिवाजी महाराज व टिपू सुलतान दोघांचेही चित्र आहे, असा दाखलाही त्यांनी दिलाय.