
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची 60 चेंडूत पोलखोल, सुपर 8 आणि बाद फेरीत टेन्शन!Image Credit source: BCCI Twitter
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. गतविजेत्या भारतीय संघाने साखळी फेरीत चांगली कामगिरी केली. एकही सामना न गमावता सुपर 8 फेरीत धडक मारली आहे. भारताचा सुपर 8 फेरीत पहिलाचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी वाटतो तितका सोपा नाही. पण उपांत्य फेरी गाठायची तर हा सामना जिंकणं भाग आहे. असं असताना साखळी फेरीत भारताची कमकुवत बाजू उघड झाली आहे. त्यामुळे भारतीय संघाला काळजीपूर्वक सामना करणं भाग आहे. त्याचं कारणंही तसंच आहे. भारताने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले आहेत. पण 7 ते 10 षटकादरम्यान फिरकीपटूंविरोधात कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
भारतीय संघाने 7 ते 10 षटकादरम्यान फिरकीपटूंविरूद्ध 60 चेंडूत 64 धावा केल्या आहेत. टीम इंडियाची सरासरी फक्त 32ची आहे आणि स्ट्राईक रेट हा 106.6चा आहे. या षटकांमध्ये इतर संघ 1168 चेंडूत 1438 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राई रेट 123.1 चा आहे. त्यामुळे इतर संघाच्या तुलनेत भारतीय संघ मधल्या फळीत फिरकीपटूंविरुद्ध अडचणीत आल्याचं अधोरेखित होत आहे. आता भारताचा सामना सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेशी होत आहे. दक्षिण अफ्रिकेनेही एकही सामना गमावलेला नाही. अशा स्थितीत भारताची कामगिरी 7 ते 10 षटकादरम्यान कशी राहते यावर सर्व काही अवलंबून असणार आहे. दक्षिण अफ्रिकेच्या ताफ्यात केशव महाराज, एडन मार्करम यासारखे कसलेले फिरकीपटू आहेत.
सुपर 8 फेरीत भारताचा दुसरा सामना झिम्बाब्वेशी होणार आहे. या संघात सिकंदर रझा, रायन बर्ल आणि ग्रेम क्रीमर हे फिरकीपटू आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध 1 मार्च रोजी सामना होणार आहे. या संघात अकील होसैन, गुडाकेश मोती असे फिरकीपटू आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना यांचा सामना करताना अडचण आली तर आश्चर्य वाटायला नको. गेल्या काही वर्षात भारतीय फलंदाज फिरकीचा सामना करताना अडखळत असल्याचं दिसून आलं आहे. त्याचे परिणाम खास करून कसोटी सामन्यात दिसले आहेत.