
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सार्वजनिक ठिकाणावरून हटवण्याचा कारणावरून दोन गटात वाद होऊन तुफान हाणामारी झाली होती. यावेळी एका महिलेला मारहाण देखील करण्यात आली होती. या घटनेवेळी घटनास्थळावर हजर असलेल्या पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी 25 ते 30 लोकांवर गुन्हे देखील दाखल केले आहे. आता गावात तणावपूर्ण शांतता असुन पोलिस सुरक्षा वाढवलेली आहे. अशातच आता मनोज जरांगे पाटीस यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पोलिसांनी आरोपींना पळून जाण्यास मदत केली – जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील यांनी या घटनेवर बोलताना म्हटले की, ‘तिथे काही मस्तवाल माजलेल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. त्यांचा उद्देश होता की महाराजांचा पुतळा फेकून द्यायचा असं गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं. तिथे आमच्या एका जिजाऊ च्या लेकीला कपडे फाटेपर्यंत मारलं. येथील काही स्थानिक पोलिसांनी आरोपींना पळून जाण्यास मदत केली असे आम्हाला सांगण्यात आले. एवढा माज कोणाला आहे? छत्रपती शिवरायांशी एवढा राग कसा काय आहे? तिथे कोण कोण माजलेल आहे आम्हाला बघू द्या. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही पाहिजे असा त्यांनी प्रयत्न केला आहे.’
जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न होता – जरांगे पाटील
पुढे बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, आमच्याकडील टोळी जेलमध्ये फेकली. राज्यात आम्ही एक नंबर आहे. इकडे आलो तर जागा शिल्लक राहणार नाही . कपाळवर कुंकू छत्रपतींमुळे आहे. जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न होता. पीडित महिला वाघीण आहे. दंगल घडवण्याचा उद्देश होता त्याबाबतची कलमं लावण्यात आली पाहिजे. या लोकांवर जबरी कलम लावा. सगळ्यांना अटक नाही केली तर नाईलाजाने राज्यातील बैठक चिखला गावात लावावी लागेल. याचे परळी सुद्धा कनेक्शन आहे.
पुतळा हटणार नाही – जरांगे पाटील
पुढे बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपीला पळविण्यात मदत केली. 25 तारखेच्या आता त्यांना अटक करा नाही तर पुन्हा येईल. पुतळा कुणीही हलवू शकत नाही. तुमचे पण पुतळे आहे राज्यात, तुम्हाला महागात पडेल. यांच्या पापाचा घडा भरलाय. त्यांनी आपल्याला संपवायचं ठरविले आहे. स्वप्न बघ म्हणा तू. देवेंद्र फडणवीस यांनी बघितले आहे , राज्यात आवाहन केले तर किती मराठे येथील ते. पुतळा हटणार नाही. सरपंचालाही अटक करा. 307 सह इतर कलमे लावा. नाही लावले तर गावात आंदोलन करणार असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला आहे. तसेच पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणीही त्यांनी केली आहे.