
Lockdown In India : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता तात्पुरते थांबले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात हे युद्ध थांबवण्यासाठी चर्चा होत आहे. दुसरीकडे या युद्धामुळे भारताला वेगवेगळ्या पातळ्यांवर तोटा होत आहे. भारतात इंधनसंकट निर्माण झाले आहे. लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पेट्रोल, डिजेल खरेदी करण्यासाठी लोक तासनतास क पेट्रोल पंपावर रांगा लागलेल्या दिसत आहेत. दुसरीकडे एलपीजी गॅस सिलिंडरही वेळेवर मिळत नाही. त्यामुळेच भविष्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे भविष्यात आता लॉकडाऊन लागणार आहे, असा दावा केला जात आहे. यावरच आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी लॉकडाऊन लागणार की नाही, याबाबतचा संभ्रम संपवून टाकला आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
देशात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का? याबाबत विचारले असता, “काही लोक जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊन लागेल, असे सांगितले जात आहे. लॉकडाऊन अजिबात लागणार नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवणारे हे एका प्रकारे देशद्रोह करत आहेत,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच अशा पद्धतीने खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर आम्ही कडक कारवाई करू, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
पीएनजी कनेक्शनसाठी सरकारचे प्रयत्न
राज्यात गॅस सिलिंडरची टंचाई जाणवू नये म्हणून सगळीकडे पीएनजी कनेक्शन घेण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. पाईप गॅस लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याबाबतचा एक शासन निर्णय काढण्यात आला आहे. सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी अटी-शर्ती शिथील केलेल्या आहेत. या गॅस पाईप लान टाकल्या तर एलपीजीची गरज भासणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
अफवांना बळी पडू नका
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी देशात कुठेही लॉकडाऊन लागणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.