
साऊथ सुपरस्टार थलपती विजयने चित्रपटांनंतर राजकारणात पाऊल ठेवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. गोष्ट त्याच्या फिल्मी करिअरची असो किंवा राजकारणात पाऊल ठेवण्याची, परंतु तमिळनाडू निवडणुकीच्या काही दिवस आधीच त्याची पत्नी संगीताने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्यातही तिने विजयवर विवाहबाह्य संबंधाचा आरोप केला आहे. पत्नीच्या या आरोपांनंतर थलपती विजयसोबत अभिनेत्री त्रिशा कृष्णनचं नाव जोडलं जात आहे. अनेकांना या चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचं वाटलं होतं. परंतु जेव्हा एका लग्न समारंभात विजय आणि त्रिशा एकाच रंगसंगतीच्या पोशाखात उपस्थिती लावली, तेव्हा मात्र सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. आता तमिळनाडू निवडणुकीनंतर हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
लग्नाच्या चर्चा कशामुळे?
विवाहित थलपती विजय आणि त्रिशाच्या रोमान्सची चर्चा त्यांच्या ‘लियो’ या चित्रपटानंतर सुरु झाली होती. चित्रपटानंतर सोशल मीडियावरील पोस्ट, सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्नसमारंभात दोघं एकत्र दिसू लागले. विजयप्रमाणेच त्रिशालाही राजकारणाची आवड असल्याने या दोघांची मैत्री आणखी घनिष्ठ होताना दिसली. आता सोशल मीडियावर एक रील व्हायरल होत असून त्यात असा दावा करण्यात आला आहे की तमिळनाडू विधानसभा निवडणुकांनंतर विजय आणि त्रिशा त्यांच्या नात्यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करतील. ही रील नेटकऱ्यांचं लक्ष वेधण्यामागचं मोठं कारण म्हणजे त्रिशाची आई उमा कृष्णन यांनी त्याला लाइक केलं आहे.
त्रिशाच्या आईने लाइक केलेली रील-
एकीकडे थलपती विजयचा संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे, तर दुसरीकडे 11 वर्षांपूर्वी त्रिशाने तिचा साखरपुडा मोडला होता. 2015 मध्ये तिने चेन्नईतील बिझनेसमन वरुण मनियनशी साखरपुडा केला होता. हे दोघं लग्नबंधनात अडकणार होते, परंतु साखरपुड्याच्या पाच महिन्यांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. एका मुलाखतीत त्रिशाने म्हटलं होतं की, तिला लग्न व्यवस्थेवर विश्वास आहे, परंतु कोणाच्या दबावाखाली येऊन तिला निर्णय घ्यायचा नाही. इतकंच नव्हे तर ज्या व्यक्तीशी लग्न होणार होतं, त्या व्यक्तीने तिच्यावर अभिनयक्षेत्र सोडण्यासाठी दबाव आणला होता, यामुळेच साखरपुडा मोडल्याचा खुलासा तिने केला होता.