
राजस्थानमध्ये शनिवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. जयपूरच्या चाकसू परिसरातील या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. कोटा-जयपूर राष्ट्रीय महामार्ग-52 वरील तिग्रिया वळणाजवळ पहाटे 5:30 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेतील मृत प्रवासी हे मध्य प्रदेशातील जबलपूरचे रहिवासी होते आणि ते धार्मिक यात्रेला गेले होते अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
5 जणांचा मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार, या भाविकांनी उज्जैनमधील महाकालेश्वर महादेवाचे दर्शन घेतले आणि नंतर ते खाटूश्यामजी येथे जात होती. त्यावेळी चालकाला झोप लागली आणि कार समोर जात असलेल्या ट्रेलरला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की कार पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. या अपघातात एका महिलेसह 5 जणांचा मृत्यू झाला. यातील 4 जण जागीच मरण पावले होते, तर एका तरुणाला गंभीर दुखापत झाली होती. त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच मरण पावला. रेश्मा श्रीवास्तव, पियुष राय, राहुल रजक, शानू आणि चालक अनुराग अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.
वाहतूक विस्कळीत
या अपघातामुळे कोटा-जयपूर राष्ट्रीय महामार्ग-52 वरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि वाहतूक पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि क्रेनच्या मदतीने खराब झालेली कार रस्त्यावरून दूर केली. त्यानंतर काही वेळानंतर वाहतूक पूर्ववत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
ते दोन दिवसांपूर्वी दर्शनासाठी निघाले होते
पोलिसांनी या अपघाताबाबत बोलताना सांगितले की, अपघातातील सर्व मृत लोक दोन दिवसांपूर्वी देवदर्शनासाठी उज्जैनला निघाले होते. त्यांनी 13 फेब्रुवारी रोजी महाकालचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ते खाटूश्यामजीकडे निघाले होते. मात्र वाटेत हा दुर्दैवी अपघात झाला आणि यात सर्वांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघातातील मृतांचे मृतदेह चाक्सू उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात हा अपघात चालकाला झोप लागल्याने घडल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता पोलिसांनी कसून तपासाला सुरूवात केली आहे. या अपघातासाठी इतर काही कारण आहे का हे पोलीसांकडून तपासले जात आहे.