
कल्याण पूर्वेत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोळसेवाडी परिसरात मध्यरात्री एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करण्यात आला. “काय बघतोस?” या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादाने थेट रक्तरंजित रूप घेतलं. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे, तर मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. आता नेमकं काय झालं होतं? चला जाणून घेऊया…
मध्यरात्री घडली घटना
कल्याण पूर्वेतील हनुमान नगर परिसरात गुरुवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. सर्वेश वायळे या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करण्यात आला. जुन्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नेमकं काय झालं?
समोर आलेल्या माहितीनुसार, “माझ्याकडे काय बघतोस, भाई झाला का ?” असे म्हणत जुन्या वादातून अचानक हा वाद चिघळला आणि हल्लेखोरांनी सर्वेशवरजीवघेणा वार करत त्याला गंभीर जखमी केलं. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी साहिल म्हात्रे असून तो एक सराईत गुन्हेगार असून तो नुकताच जेलमधून बाहेर आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्यावर यापूर्वीही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
दरम्यान, कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, कल्याण पूर्वेत वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून रात्रीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
पोलिसांकडून आश्वासन
कोळसेवाडी पोलिस स्टेशनने या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल केला असून, मुख्य आरोपी साहिल म्हात्रे याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या मदतीने तपास सुरू आहे.