
भिगवण कथित अपहरण प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील तरुणीने आता कोर्टात आपला जबाब बदलला आहे. सुधारगृहात पाच दिवस राहिल्यानंतर तिने आपल्या आई आणि मामाकडे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
यापूर्वी बारामती न्यायालयासमोर हजर असताना, या तरुणीने (वैष्णवी) आईसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे बारामती न्यायालयाच्या आदेशानुसार तिला महिला सुधारगृहात ठेवण्यात आले होते. सुधारगृहातील मुक्कामानंतर तिच्या मानसिकतेत बदल झाल्याचे दिसून येते.
आज इंदापूर कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी वैष्णवीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयापुढे हजर करण्यात आले. कोर्टाने तिला कोणाकडे जायचे असे विचारले असता, तिने आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा असल्याचे सांगितले. तिच्या या इच्छेनुसार, मेहेरबान न्यायालयाने तिचा ताबा तिची आई आणि मामा यांच्याकडे देण्याबाबत आदेश पारित केला आहे.