
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. भोंदू बाबा अशोक खरात याच्याभोवती अटकेनंतर तपासाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. आता या प्रकरणाला राजकीय आणि प्रशासकीय वळण मिळाले आहे. त्यातच आता अशोक खरातच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची निमंत्रण पत्रिका विशेष तपास पथक म्हणजेच SIT च्या रडारवर आली आहे. या लग्नसोहळ्याला उपस्थित असलेल्या बड्या राजकीय नेत्यांसह वरिष्ठ आयएएस (IAS) आणि आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांची आता चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लग्नपत्रिकेतील नावांनी उडाली खळबळ
अशोक खरातच्या मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रिकेत राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या दिग्गज नेत्यांची नावे प्रमुख पाहुणे म्हणून छापण्यात आली होती. विशेष म्हणजे, यात काही विद्यमान मंत्र्यांच्या नावांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. यातील अनेक नेत्यांनी प्रत्यक्षात लग्नाला हजेरी लावल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संशयाचे वातावरण गडद झाले आहे.
IAS आणि IPS अधिकारी पूर्णवेळ उपस्थित?
SIT कडे असलेल्या माहितीनुसार, केवळ राजकीय नेतेच नव्हे तर नाशिक, अहिल्यानगर, मुंबई आणि दिल्ली येथील काही वरिष्ठ अधिकारी देखील या सोहळ्यात सहभागी झाले होते. काही आयएएस आणि आयपीएस अधिकारी हे पूर्णवेळ या लग्नाला उपस्थित होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अधिकाऱ्यांचे खरातशी नेमके काय संबंध होते, त्यामागे काही आर्थिक हितसंबंध आहेत का, याचा तपास सध्या सुरू आहे.
ashok kharat daughter marriage invite
या प्रकरणाच्या तपासात असेही निष्पन्न झाले आहे की या विवाह सोहळ्याला केवळ राज्यातीलच नव्हे तर दिल्लीसह काही परदेशी पाहुणेही उपस्थित होते. या व्हीआयपी वऱ्हाडींची स्वतंत्र यादी तयार केली जाणार आहे. SIT ने ही यादी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या सर्व पाहुण्यांची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीनंतर अशोक खरातच्या साम्राज्याला कोणाकोणाचे पाठबळ होते, याचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान या प्रकरणावर राज्याचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्रिकेवर नाव असण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “मला या लग्नाबाबत काहीही माहिती नाही. ग्रामीण भागात प्रतिष्ठा म्हणून अनेकांची नावे पत्रिकेवर टाकण्याची पद्धत आहे. संबंधिताने नाव टाकताना विचारले होते की नाही, हे मला ठाऊक नाही. माझे नाव त्या पत्रिकेवर होते, हे मला आताच कळले आहे.” असे त्यांनी म्हटले.