
ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करणाऱ्या आणि अफाट संपत्ती गोळा करणाऱ्या स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. सध्या या प्रकरणाच्या SIT चौकशीला वेग आला आहे. आता हा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणाचा ताबा घेताच डिजीटल पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. याद्वारे खरातचे मोठे नेटवर्क समोर येणार असल्याचे बोललं जात आहे.
नेमके प्रकरण काय?
मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झालेला अशोक खरात स्वतःला कॅप्टन म्हणवून घेत असे. नाशिक आणि सिन्नर परिसरात त्याने अंकशास्त्रज्ञ आणि कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. सिन्नरच्या मिरगाव येथे त्याने श्री ईशान्येश्वर मंदिर नावाचे भव्य संस्थान उभारले होते. एका ३५ वर्षीय महिलेने खरातवर गुंगीचे औषध देऊन वारंवार बलात्कार केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
SIT चौकशीत काय?
सध्या याप्रकरणाची एसआयटी चौकशी सुरु असून डिजिटल फॉरेन्सिक तपासही केला जात आहे. पोलिसांनी खरातचे मोबाईल, लॅपटॉप आणि पेनड्राइव्ह जप्त केले आहेत. डिजिटल फॉरेन्सिकच्या मदतीने खरातचे कोणाशी संपर्क होते आणि त्याने कोणाकोणाची फसवणूक केली, याचे तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ लागले आहेत. या व्हिडीओमध्ये अनेक महिला असल्याचे स्पष्ट होत असून, या पीडितांना शोधून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी SIT प्रयत्न करत आहे. अशोक खरातकडे नाशिक, सिन्नर आणि शिर्डी परिसरात सुमारे २०० कोटींची बेकायदेशीर मालमत्ता असल्याचा संशय आहे. त्याच्या फार्महाऊसवर झालेल्या छाप्यात पोलिसांनी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जप्त केली आहे.
खरात हा एकटाच हे कृत्य करत नव्हता, तर त्याचे मोठे जाळे पसरलेले होते. त्याचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे आणि त्याला गुन्ह्यात मदत करणाऱ्या सहकाऱ्यांचा शोध आता पोलीस घेत आहेत.
राजकीय आणि सामाजिक खळबळ
दरम्यान खरातच्या दरबारात राज्यातील अनेक बडे नेते आणि अधिकारी हजेरी लावत असत. अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचे भविष्य सांगून त्याने आपले वजन वाढवले होते. आता पोलिसांच्या हाती लागलेल्या व्हिडिओमध्ये काही मोठे चेहरे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.