
टी-20 विश्वचषक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव मुंबईत दाखल झाला. चेंबूर येथील त्याच्या घरी शेजाऱ्यांनी त्याचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले. आरती ओवाळून आणि मिठाई वाटून या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळेही उपस्थित होते, त्यांनीही सूर्यकुमारचे अभिनंदन केले.
आपल्या घरी परतल्यावर मिळालेल्या प्रेमाने भारावून गेलेल्या सूर्यकुमारने, विमानातून उतरल्यापासूनच काहीतरी वेगळे घडणार असल्याची जाणीव झाल्याचे सांगितले. 2024 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकल्यावर खेळाडू म्हणून मिळालेल्या यशानंतर, कर्णधार म्हणूनही विश्वचषक जिंकण्याची जिद्द मनात असल्याचे त्याने नमूद केले. त्याने संघाला एकत्र आणून कठोर परिश्रम घेतल्याचे सांगितले. भविष्यात ऑलिम्पिकमध्येही क्रिकेटमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे आपले ध्येय असल्याचे त्याने यावेळी स्पष्ट केले.