
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत देशातील 5 महत्त्वाच्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांची तर पुद्दुचेरी या केंद्रसाशित प्रदेशात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच इतरही काही राज्यांमधील पोट निवडणुकांचीही यावेळी घोषणा करण्यात आली. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा निवडणुकीसाठी पोट निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा
अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते. यामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभेचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे काही काळापूर्वी निधन झाले आहे, त्यामुळे राहुरी विधानसभेचीही जागा रिक्त झाली होती. आता निवडणूक आयोगाने या जागांवर पोट निवडणुकीची घोषणा केली आहे. बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
कोणत्या राज्यात कधी मतदान, कधी निकाल?
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 9 एप्रिल रोजी आसाम, केरळ या दोन राज्यांत तसेच पुद्दुचेरी या केंद्रशाशित प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. तामिळनाडू येथे 23 एप्रिल रोजी मतदान होईल. तर पश्चिम बंगाल या एमेकव राज्यात दोन 23 एप्रिल आणि 29 एप्रिल अशा दोन टप्प्यांत मतदान होणार. या सर्व चार राज्ये तसेच एका केंद्रशाशित प्रदेशाच्या निवडणुकीचा निकाल 4 मे रोजी जाहीर होणार आहे.
राज्यातील दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होणार?
बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. आता या दोन्ही निवडणुका बिनविरोध होण्याचीही शक्यता आहे. बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्री पवार या निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे विरोधी पक्षातून या जागेवर उमेदवार कदाचित दिला जाणार नाही. तसेच राहुरीतही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाण्याची शक्यता आहे.