
छत्रपती संभाजीनगरमधील शेलार कुटुंब सध्या दुबईत अडकले आहे. डॉ. प्रीतम शेलार, त्यांची पत्नी डॉ. हर्षदा शेलार आणि त्यांचे दोन लहान मुले शौर्य व आर्य असे हे कुटुंब दुबईत पर्यटनासाठी गेले होते. ईराण-इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे दुबईतील विमानतळ तात्पुरते बंद झाल्याने आणि विमानांचे वेळापत्रक कोलमडल्याने ते मायदेशी परत येऊ शकले नाहीत.
शेलार कुटुंब डेरा येथील अवरी हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याचे त्यांचे नातेवाईक साई शेलार यांनी सांगितले. साई शेलार यांनी केंद्र व राज्य शासनाकडे कुटुंबाला लवकरात लवकर मायदेशी परत आणण्याची मागणी केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त करत, शासनाने तात्काळ या प्रकरणात लक्ष घालावे अशी विनंती केली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून मदतीचे आश्वासन दिले आहे.