
“चंद्रकांत पाटील यांनी खरातकडे अघोरी पूजा केली. 2019 ला चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री होण्यासाठी अघोरी पूजा केली. एकनाथ शिंदे गटाने सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांना पदावरून खाली खेचण्यासाठी पूजा केली. ही संविधानाची पायमल्ली आहे. संविधान अमान्य करून पुन्हा मनुस्मृतीचे दिवस आणायचे हे कटकारस्थान फडणवीस यांचे आहे” असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ते महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. “काल दोन ट्विट केले होते. एक मुख्यमंत्री होण्यासाठी तर दुसरे मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्यासाठी अघोरी पूजा केली होती. SIT ला काम करू दिले तर एक डझन मंत्री आणि दोन डझन अधिकारी घरी बसतील” असा आरोप सपकाळ यांनी केला.
“नीती भ्रष्ट आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे हे सरकार आहे. अजित पवार सारखे दिल्लीला जाऊन पंतप्रधान, अमित शाहंना जर भेटले तर मुख्यमंत्र्यांच्या पोटात दुखत होते. पार्थ पवारांचे जमिनीची प्रकरण हे देवेंद्र फडणवीस यांनीच उकरून काढले. फडणवीस साहेब खरात प्रकरण आपल्याला सहा महिन्यापेक्षा अधिक काळ माहिती होते तर आपण झोपले होते का?”अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
गिरीश महाजन हे जेम्स बाँड
“झिरवाळ यांच्या कार्यालयात लाच घेताना जर कर्मचारी पकडला होता. त्यावेळी आम्ही राजीनाम्याची मागणी केली होती. खरात प्रकरणातील मंत्री असो की झिरवाळ प्रकरणातील, सगळ्यांचे राजीनामे झाले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी खरात प्रकरणावर निवेदन करुन सारवासारव केली असून या प्रकरणाचा राजकीय वापर फडणवीस करत आहेत” असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. “विरोधकांना गप्प बसवण्यासाठी ते वापरत करत आहेत. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे जेम्स बाँड आहेत” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
हा त्यांचा पक्षातील अंतर्गत विषय
“उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत खासदार नाराज हा त्यांचा अंतर्गत पक्षातील विषय आहे.त्यावर बोलणे योग्य राहणार नाही. मात्र राज्यसभा, विधानपरिषद उमेदवारी संदर्भात महाविकास आघाडीत व्यापक चर्चा होणे आवश्यक आहे. मागच्या काळात झाली नाही, पण पुढील काळात होणे आवश्यक आहे” असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
सुप्रिया सुळे यांनी ताबडतोब खुलासा द्यावा
सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांचे कौतुक केले. त्यावर विचारल्यावर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “सुप्रिया ताई यांचे विधान हे धादांत दिशाभूल करणारे आहे . RSS ची भूमिका, वारसा फडणवीस पुढे घेऊन जात आहेत. सुप्रिया सुळे यांनी जे वक्तव्य केले त्याबद्दल मी दुःख आणि खंत व्यक्त करतो. चोर आणि संन्याशाला एकत्र दाखवण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला, याबद्दल त्यांनी ताबडतोब खुलासा द्यावा” अशी मागणी त्यांनी केली.