
नंदुरबार जिल्ह्यातील ऐतिहासिक रावलापाणी शहीद स्थळाकडे जाणाऱ्या मार्गावरील तळोदा तालुक्यातील हातबारीपाडा येथे भीषण पाणीटंचाईचे चित्र समोर आले आहे. येथील नागरिक पाणीटंचाईच्या प्रश्नामुळे खूपच त्रस्त आहेत.
आज २ मार्च शहीद दिनानिमित्त हजारो नागरिक या स्थळाला भेट देत असताना, स्थानिक ग्रामस्थांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी निझरा नदीच्या पात्रात झिरा करून पाणी काढावे लागत आहे.
सुमारे २५० लोकवस्ती असलेल्या या पाड्यात कोणतीही सक्षम पाणीपुरवठा योजना नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. येथील एकमेव हातपंपही निकामी ठरल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
या पार्श्वभूमीवर युवा क्रांती नंदुरबार संघटनेने प्रत्यक्ष पाहणी करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ऐतिहासिक स्थळाकडे जाणाऱ्या या मार्गावरील पाड्यांत तातडीने बोरवेल किंवा कायमस्वरूपी जलवाहिनी सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.
तसेच आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अॅड. रुपसिंग वसावे आणि पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.