
राज्याच नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने खळबळ माजली आहे. या प्रकरणात दररोज वेगवेगळे धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. अशोक खरातने केलेली काळी कृत्ये कित्येक वर्षांनंतर समोर येत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात केलेल्या एका धक्कादायक आरोपाने जुने २००८ सालचे हत्याकांड पुन्हा चर्चेत आले आहे. हे प्रकरण आहे स्थानिक पत्रकार बाळू तुपे यांच्या हत्येचे.
कोण होते बाळू तुपे?
बाळू तुपे हे नाशिकमधील स्थानिक वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून काम करत होते. त्यांची गुन्हेगार वर्तुळात चांगली उठबस होती असे सांगितले जाते. शिवाय ते पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शहरातील अवैध धंद्यांवरून ब्लॅकमेल करत असल्याचेही आरोप त्यांच्यावर होते. २००५ साली त्यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीवर ‘कॅप्टन खरात’ म्हणजेच अशोक खरात यांच्याविरोधात एक विशेष मालिका चालवली होती. त्यानंतर तीन वर्षांनी, २००८ मध्ये बाळू तुपे यांची हत्या करण्यात आली. ही हत्या नाशिकच्या स्टेट बँक परिसरात एका होर्डिंगवरून झालेल्या वादातून घडली होती.
बाळू तुपे हत्येप्रकरणी आठ जणांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. यात कुणाल रोकडे, संदीप रोकडे, राकेश रोकडे, चंद्रकांत निकम, अमित बोरुडे, शकील अन्सारी, सागर पगारे आणि पवन जाधव यांचा समावेश होता. मात्र, पुराव्याअभावी न्यायालयाने या सर्व आठही आरोपींना निर्दोष मुक्त केले होते.
आता अशोक खरात प्रकरण तापले असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दावा केला की, बाळू तुपे यांच्या हत्येमागे अशोक खरातचा हात होता. या आरोपाने मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, निर्दोष सुटलेल्या आरोपींच्या नातेवाईकांनी या आरोपांचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी स्पष्ट खुलासा केला की, “आम्ही कोणत्याही कॅप्टन खरातला ओळखतही नव्हतो. २००८ साली अशोक खरात हे नाव नाशिकमध्ये कोणालाही माहित नव्हते. बाळू तुपे हत्येमध्ये आमचा काहीही संबंध नव्हता, म्हणूनच न्यायालयाने आम्हाला निर्दोष सोडले होते.” सध्या हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यामुळे पोलिस याबाबत अधिक तपास करतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण?
अशोक खरात प्रकरणात अजूनही अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. पोलिस तपास सुरू असून, या नराधमाच्या पूर्ण साखळीचा पर्दाफाश होण्याची अपेक्षा आहे. नाशिकच्या स्वयंघोषित ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात यांच्या लैंगिक शोषण, बलात्कार आणि इतर गंभीर आरोपांच्या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) ने तपासाला वेग दिला आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबाबत सर्व माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘एकूण ८ महिलांचे ३५ व्हिडीओ समोर आले. सदर व्हिडीओत अशोक खरातने भोंदूगिरी आणि तंत्रमंत्र करून अनेक महिलांशी बलात्कार आणि अश्लील चाळे केल्याचे दिसले.’ तसेच हे व्हिडीओ खरातच्या जवळच्या व्यक्तीने देऊन गेम केल्याचे सांगितले.