
मुंबई : पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांची राजकीय फटकेबाजी पाहायला मिळाली. त्यामध्ये, थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील शाब्दिक वॉरही पाहायला मिळालं. आता, विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही एकनाथ शिंदेनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) थेट प्रहार केलाय. 3 वर्षांपासून माझ्या नावाने फक्त शिव्या-शाप सुरू आहेत. सभागृहात दोन दिवस चर्चा झाली, मी अंबादास यांचं कौतुक करता होतो, कोणाला काय इतकं लागण्याच कारण नव्हतं. पावसाळ्यात छत्र्या उगवतात की बेडूक, परंतु एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पहिला नाही, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
ज्यांना संपलेला बोलले, त्यांच्याच सोबत आता रोज जात आहेत. चल मेरे भाई हात जोडता हूँ.. या गाण्याची आठवण होत आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेनी शिवसेना-मनसे युतीच्या चर्चेवरुन टोला लगावला. देवेंद्रजी यांना किती शिव्या दिल्या याचे साक्षीदार आम्ही आहोत. जनतेने शिवसेना भाजपला मतदान केलं होतं. आम्ही ताटात माती कशी कालवली? माती तर तुम्ही केली, देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खूपसला. निकालानंतर देवेंद्रजी यांनी अनेक फोन केले, पण फोन उचलला नाही, केलेलं इथंच फेडावं लागतं. मुंबईचं महापौरपद देवेंद्र फडणवीस यांना मिळालं होतं, तेव्हा अर्ध्या तासात त्यांनी महापौरपद शिवसेनेला दिलं. पण, परतफेड न करता दगाबाजी केली. साधा फोन उचलायचा असतो, अशी आठवण एकनाथ शिंदेंनी आजच्या भाषणातून करुन दिली.
देवेंद्रजींना बोलले एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन, कट कारस्थान करुन आत टाकायचा प्रयत्न केला. तेव्हा मी ठरवलं की आता कार्यक्रम करायचा. माझ्यावर टीका करायच्या आधी तुमच्याकडे तीन बोटं येतात. मुख्यमंत्री यांच्याकडे सगळेच जातात, किती द्वेष. मी सर्वसामान्य कुटुंबाचा मुलगा मुख्यमंत्री झाला. इतकी पोटदुखी असता कामा नये. हे जे काही सुरु आहे, ते पाहून देवेंद्रजी मनातल्या मनात हसते असतील, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
उद्धव ठाकरेंचा केमिकल लोचा झालाय
एकीकडे आरएसएसला टोमणे मारायचे बाळासाहेबां चं स्वप्न पूर्ण करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अमित भाईंना शिव्या द्यायच्या. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना बुके द्यायचा. केमिकल लोचा झाला बहुदा, असा टोलाही एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना लगावला. किती कोतेपणा आहे, आपण लता मंगेशकर संगीत महाविद्यालय करणार होतो. 24 एप्रिल 2022 रोजी हृदयनाथ मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला लता मंगेशकर पुरस्कार दिला आणि तिथेच पापड मोडला. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रम झाला, तिथं हे आले नाहीत. नरेंद्र मोदीबाबत यांच्या मनात किती द्वेष आहे, याचे साक्षीदार उदय सामंत आहेत, असेही एकनाथ शिंदेनी म्हटलं.
आम्ही कुणाचं ताट घेणारे नाहीत
मी सोन्याचा चमचा कुणाला उद्देशून बोललो नव्हतो, यांना बोललो नव्हतो. आम्ही एक भाकर 4 जण वाटून खाणारे आहोत. आम्ही कुणाचं ताट घेणारे लोक नाहीत, आम्ही सत्ता सोडून गेलेले लोकं आहोत. आम्ही देणारे आहोत घेणारे नाही, कोव्हिड रुग्णांचे घास काढले यांनी काढले असे म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
3 वर्षांपासून रोज शिव्या-शाप
जळी-स्थळी काष्ठी पाषाणी मी दिसतोय. 3 वर्षांपासून रोज शिव्या शाप, आरोप, मत्सर एकच कॅसेट रोज ऐकतोय. पदं येतात-जातात पण एकनाथ शिंदेला अडीच कोटी महिलांचा भाऊ ही उपाधी मिळाली. आम्ही गुवाहाटीला असताना निरोप यायचे, दुसरीकडून दिल्लीत संधान साधायचं की यांना घेऊ नका, आम्ही येतो हे चाललं होतं. आम्ही सत्ता सोडून गेलो, मी छेडत नाही पण मला छेडलं तर मी सोडत नाही. सत्ता आणि खुर्चीसाठी अनेकांनी तडजोड केली, मी करणार नाही असेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
हेही वाचा
आणखी वाचा