
Mumbai Rain News: मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. सध्या पश्चिम द्रुतगती मार्गावरती पाऊस पडत आहे. त्याचबरोबर वारा देखील सुटला आहे. शुक्रवार असल्याने सर्व चाकरमानी हे कामावरती पावसातून वाट काढत जात आहेत. तर काहींनी आता छत्री, रेनकोटचा आधार घेत प्रवास सुरु केला आहे. त्याचबरोबर वांद्रे स्थानकावरती देखील सर्व लोकल या सध्या वेळापत्रकानुसारच,वेळेवर चालू आहे. मात्र पावसाचा जोर वाढला तर रेल्वे वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
तीन तास मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
दरम्यान, मुंबई आणि मुंबई उपनगर प्रमाणेच ठाण्यात देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन तास मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे सध्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे या भागातील सखल भागांमध्येही पाणी भरायला सुरुवात झालीय. सध्या उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुज वांद्रे या सर्व परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी महानगरपालिकेचे टीम अलर्ट मोडवर आली असून परिस्थितीचा आढावा घेऊन मदत कार्य सुरु आहे. ठाण्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणावर वाहणांची वाहतूक कोंडी देखील झाल्याचे बघायला मिळत आहे. सध्या ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतो आहे.
पावसामुळे विलेपार्ले परिसरात वाहणांची वाहतूक कोंडी
मुंबईमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या ऑरेंज अलर्टनुसार ठिकठिकाणी जोरदार पावसाची नोंद होत आहे. या पावसामुळे विलेपार्ले परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. विलेपार्ले ब्रिजखाली पाणी साचले असून, पुलावरून वाहून आलेलं पाणी थेट सर्व्हिस रोडवर जमा झालं आहे. त्यामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. सध्या महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, पाणी उपसण्यासाठी पंपिंग मशीनचा वापर सुरू करण्यात आलाय. प्रशासनाकडून पाणी तातडीने काढण्याचे प्रयत्न सुरू असले तरी सध्या वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.
भामरागड तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला
गडचिरोलीत गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढल्याने तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान आज गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट असून मुलचेरा तालुक्यातील सर्व शाळांना तहसीलदार यांनी सुट्टी जाहीर केली आहे. तत्पूर्वी काल झालेल्या मुसळधार पावसामुळे आलापल्ली येथील 17 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. रात्रीही मुसळधार पाऊस झाला. आता पावसाने उसंत घेतली असली तरी वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. त्यातच लहान नदी, नाल्यांना पूर आल्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा
आणखी वाचा