
Manikrao Kokate resignation speculations: शेतकऱ्यांविषयी सातत्याने वादग्रस्त वक्तव्यं करणारे आणि विधानपरिषदेत ऑनलाईन रमी खेळल्याचा ठपका असलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी लवकरच गच्छंती होण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे कृषीमंत्रिपद जाणार, हे जवळपास निश्चित असून आता त्यांचे मंत्रिमंडळात (Maharashtra Cabient) इतरत्र पुनर्वसन होणार की त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार, याबाबतचा निर्णय बाकी असल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोन दिवस दिल्लीत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. फडणवीस यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे माणिकराव कोकाटे यांची कृषीमंत्रिपदावरुन उचलबांगडी होण्याच्या चर्चांनी आणखी जोर धरला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये महायुती सरकारमधील अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले होते. त्यामुळे महायुती सरकारमध्ये मोठे फेरबदल होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. ‘शिंदे गटाचे संजय शिरसाट, गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार’, ‘राहुल नार्वेकर यांच्याऐवजी सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्षपदी बसवले जाणार’, अशा अनेक वावड्या उठल्या होत्या. परंतु, देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीत दौऱ्यात मंत्रिमंडळ फेरबदलाविषयी कुठलीही चर्चा झाली नसल्याचे समजते. फक्त माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीमंत्रिपद काढून घेतले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Maharashtra Agriculture minister: माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरु?
कृषिमंत्री कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात शनिवारी रात्री उशिरा अजित पवार आणि सुनील तटकरेंची बैठक झाली. अजित पवार लवकरच यासंदर्भात पक्षातील इतर नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव निर्माण केला जात आहे. रद पवार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. यावेळी शरद पवार हे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी माणिकराव कोकाटे यांची कृषीमंत्रिपदावरुन उचलबांगडी केली जाईल, असे संकेत मिळत आहेत.
या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे तातडीने मुंबईकडे रवाना झाले होते. ते नंदुरबारहून दादर स्पेशल रेल्वेने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यांनी शनिवारी नंदुरबार येथील शनिमांडळच्या प्रसिद्ध शनिमंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. त्यांनी मंदिरात विधिवत पूजा करुन शनिदेवाला अभिषेक केला होता. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी नाशिकला न जाता मुंबईकडे प्रयाण केले होते.
विधान परिषदेतलं ऑनलाईन पत्ते प्रकरण असो किंवा शासनाला भिकाऱ्याची दिलेली उपमा, कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून सगळ्यांनीच कानउघाडणी केली होती. अजित पवारांनीही कोकाटेंना खडेबोल सुनावले होते. ‘याआधी दोन वेळा समज देऊनही इजा बिजानंतर माणिकरावांनी तिजाची वेळ आणलीच’, अशी उद्विग्न प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. सोमवारी किंवा मंगळवारी अजित पवार माणिकराव कोकाटेंशी चर्चा करणार आहेत. आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेणार आहेत. म्हणजे माणिकराव कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार अजूनही कायम असून पुढच्या आठवड्यात त्यांचा फैसला होणार आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा