
BJP on alert mode due to Thackeray brothers coming together: मराठी विजय दिवस एकत्र साजरा केल्यानंतर ठाकरे बंधूंमध्ये वाढलेली जवळीकता आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन बंधू एकत्र येत असल्याचे संकेत मिळत असताना जाता भाजप सुद्धा अलर्ट मोडवर आला आहे. ठाकरे बंधूंमुळे मुंबईमध्ये किती परिणाम होऊ शकतो? याबाबत आता भाजपकडून आतापर्यंत ताळेबंद करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आज मुंबईमध्ये भाजपकडून विविध सेलच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. दादरमधील वसंत स्मृतीमध्ये सकाळी11:00 वाजेपासून ही बैठक होणार आहे. ही बैठक मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांनी बोलावली आहे. या बैठकीसाठी मुंबईचे आमदार, प्रमुख नेते आणि विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये काय चित्र असेल याचा सुद्धा आढावा घेणार
या बैठकीमध्ये मुंबईमधील मराठी, हिंदी भाषिक तसेच गुजराती मते वळण्यासाठी काय करता येईल याबाबत विचार केला जाणार आहे. दरम्यान, दोन ठाकरे बंधू मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्र आल्यास मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये काय चित्र असेल याचा सुद्धा आढावा घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दुसरीकडे दोन दिवसापूर्वीच शेकापच्या व्यासपीठावरून बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला होता. हिंदी भाषेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून प्रहार केला होता. जन सुरक्षा कायद्यावरूनही भाजपला हल्लाबोल केला होता. त्यांनी अटक करून दाखवाच, अशा शब्दात जन सुरक्षा कायद्यावरून आव्हान दिलं आहे. मराठी माणसांच्या थडग्यावर महाराष्ट्रात उद्योग येऊ देणार नसल्याचा इशारा सुद्धा राज ठाकरे यांनी या भाषणामध्ये बोलताना दिला होता.
शिवसेना शिंदे गटाकडूनही पक्षविस्तारासाठी प्रयत्न
दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडूनही ज्येष्ठ नेते आणि खासदारांवर महत्त्वाच्या जबाबदारी दिल्या जाणार आहेत. शिवसेनेचा विस्तार महाराष्ट्राबाहेर करण्यासाठी विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यातील राज्यप्रमुखांसोबत खासदारांकडे काही राज्यांची प्रमुख जबाबदारी राहणार आहे. पक्षाचा विस्तार करण्याच्या अनुषंगाने राज्य प्रमुख आणि खासदारांनी बैठका व पक्ष बांधणी त्या त्या राज्यात करायचे असे धोरण आहे. ज्येष्ठ नेत्यांनी कामाचा आढावा घेऊन मार्गदर्शन करायचं आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ, रामदास कदम, गजानन किर्तीकर, निलम गोर्हे यासह अन्य ज्येष्ठ नेत्यांना या राज्यप्रमुख आणि खासदार यांना त्या त्या राज्यांचे दौरे करून पक्ष वाढीबाबत महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा