Mumbai BEST Election: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असलेल्या मुंबईतील दी बेस्ट एम्प्लॉइज को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे दोन्ही पक्ष ही निवडणूक एकत्रितपणे लढवत आहेत. गेल्या 20 वर्षांपासून बेस्ट संघटनेत ठाकरे गटाचे (Thackeray Camp) वर्चस्व आहे. त्यांच्यासमोर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांचे आव्हान आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. मात्र, आता एका अनपेक्षित घटनेमुळे या निवडणुकीत ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलमध्ये शिंदे गटाच्या बबिता पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. यावरुन ठाकरे गटात नाराजी पसरल्याची माहिती आहे.
दी बेस्ट एम्प्लॉइज को. ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणूक येत्या 18 ऑगस्टला होत आहे. या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलमध्ये माझगाव येथील बेस्टच्या कर्मचारी बबिता पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कामगार सेनेत नाराजी निर्माण झाली आहे. परिणामी ठाकरे गटाचे समर्थक या निवडणुकीपासून दूर राहताना दिसत आहेत. बबिता पवार यांना उमेदवार देण्यात आल्याने भायखळा, शिवडी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक नाराज झाल्याचे समजते. परळमधील बेस्टच्या वसाहतीत पतपेढीचे सर्वाधिक सभासद आहेत. बबिता पवार यांना उमेदवारी दिल्याने बेस्टच्या ठाकरे समर्थक कामगारांनी सोमवारी शिवसेना भवनात जाऊन आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. आदित्य ठाकरे यांना अंधारात ठेऊन बबिता पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलशी दोन हात करण्यासाठी भाजप नेते प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांची श्रमीक उत्कर्ष सभा, नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना, शिंदे गटाचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्र येत सहकार समृद्धी पॅनेलच्या माध्यमातून एकत्रित आघाडी तयार केली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंसाठी ही लिटमस टेस्ट मानली जाते.उत्कर्ष पॅनेलमध्ये 21 पैकी शिवसेना (उबाठा) 19, तर मनसे दोन जागा लढवणार आहेत.
Raj Thackeray and Uddhav Thackeray: ठाकरे ब्रँड आम्ही बंद करणार; प्रसाद लाड यांची गर्जना
भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने राज आणि उद्धव या ठाकरे बंधुंना आव्हान दिले आहे. पहिल्या निवडणुकीलाच त्यांना पराभवाला सामोरं जावे लागणार आहे. लोकांचा विश्वास, लोकांची गर्दी या ब्रँडला बंद करायच्या तयारीला लागली आहे. स्वदेशी माल चालणार आहे. ठाकरे ब्रँड आम्ही या निवडणुकीत बंद करणार असल्याचे प्रसाद लाड म्हणाले. या टीकेला आता ठाकरे गट आणि मनसे काय प्रत्युत्तर देणार, हे बघावे लागेल.
आणखी वाचा
आणखी वाचा