
बीड : विजयादशमी दसऱ्याचा आजचा दिवस विविध ठिकाणच्या दसरा मेळाव्यांनी (Dasara melava) गाजत असून सारवगाव येथे पंकजा मुंडेंच्या नेतृत्वातील दसरा मेळाव्यातून धनंजय मुंडे आणि पकंजा मुंडेंनी जातीवादावर प्रहार करत भाषण जागवले. त्यानंतर, नारायण गडावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj jarange) यांनीही मराठा समाजाला उद्देशून भाषण केलं. तत्पूर्वी नारायण गडावर जाऊन त्यांनी दर्शन घेतले. यावेळी, त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळल्याचं दिसून आलं. जरांगे पाटील रुग्णालयातून या दसरा मेळाव्यासाठी खास नारायण गडावर (Beed) आले होते. त्यामुळे, आजारपणातच त्यांनी जोरकसपणे भाषण केले.
विराट संख्येनं जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय.. असे म्हणत जरांगे पाटील यांनी नारायण गडावरुन आपल्या भाषणाला सुरुवात केली. मायबापहो… मला बोलायला लई त्रास होतोय, आपला गड नगद आहे म्हणून बोलायला ताकद मिळतेय. जशी मला मिळाली, तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळेल. लई वेदना आहेत, शरिराला त्रास आहे. मी 5-6 महिन्यांपूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की, मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी भावनिक भाषण केलं. त्यावेळी, नारायण गडावरील वातावरण भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तर, जरांगे पाटलांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरळले होते. तरीही, जरांगे पाटील यांनी उपस्थित आणि मराठा समाजाला उद्देशून भाषण केलं.
दसऱ्याच्या निमित्ताने सांगतो, जातीला सांभाळायचं असेल तर तुम्हाला शासक बनावं लागेल आणि प्रशासकही बनावंही लागेल. प्रशासनात एवढी ताकद आहे, दादा जरी असला तरी हात जोडून प्रशासनापुढे उभं राहावं लागतं, तुमच्या पोरांना तहसीलदार, PSI, कलेक्टर बनवा. तुमचं पोरगं-पोरगी तहसीलदार, PSI, कलेक्टर बनवा. अधिकारी बनवा. प्रत्येक क्षेत्रात जर आपलं लेकरु गेलं ना तर या गरीब समाजाला बसायला आधार होईल. सगळे बोगस लोकं जाऊन तिथे बसलेत, बोगस आरक्षण घेतलेले बसलेत बोगस, असे म्हणत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरकारी नोकरीत वरिष्ठ पदावर जाण्याचं आवाहन केलंय. तसेच, मराठा आरक्षण ओबीसी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कामाला लागा, प्रमाणपत्र काढून घ्या, असेही पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा
आणखी वाचा