
Supriya Sule & Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर होत आहे. मतमोजणीचे प्राथमिक कल पाहता भाजप आणि जदयू यांच्या एनडीए आघाडीला (NDA) बहुमत मिळण्याची दाट शक्यता आहे. साहजिकच या सगळ्याचा परिणाम राष्ट्रीय राजकारण आणि देशातील आगामी निवडणुकांवर होणार आहे. त्यामुळे अनेकजण बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे बारकाईने डोळे लावून बसले आहे. बिहारमध्ये एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत असल्यामुळे संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशनला सुरुवात केली आहे. या सगळ्या गदारोळात महाराष्ट्रात एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. (Bihar Election Result 2025)
काहीवेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीला दाखल झाल्या होत्या. सुप्रिया सुळे (Supriya Sule) शुक्रवारी सकाळी अचानक देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर गेल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आता या भेटीमागील कारणही समोर आले आहे. ही भेट राजकीय स्वरुपाची नाही. तर सुप्रिया सुळे या युगेंद्र पवार यांच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका देण्यासाठी वर्षा बंगल्यावर आल्याचे समजते.
Pune Navale bridge Accident: नवले ब्रीज अपघातानंतर सुप्रिया सुळेंची नितीन गडकरींना विनंती
नवले पूल येथे काल झालेला अपघात अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेत काही नागरीक मृत्युमुखी पडले तर अनेक जण जखमी झाले. यापुर्वीही येथे झालेल्या अपघातात जिवितहानी झाली आहे. हे रोखण्यासाठी नऱ्हे ते रावेत या मंजूर असलेल्या एलिव्हेटेड मार्गासह इतर एलिव्हेटेड मार्गांचे काम तातडीने सुरु करण्याची गरज आहे. यासोबतच रस्ते सुरक्षेबाबत देखील सातत्याने जनजागृती करण्याची तसेच शहरांच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यांचे तातडीने ‘सुरक्षा ऑडीट’ होण्याची गरज आहे. माझी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन जी गडकरी यांना नम्र विनंती आहे की कृपया आपण नऱ्हे ते रावेत दरम्यानच्या एलिव्हेटेड मार्गाचे काम तातडीने सुरु करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला द्याव्या. यासह रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मोहिम हाती घ्यावी, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
Bihar Election Result 2025: बिहारमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये सत्ताधारी एनडीए आघाडीवर
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भाजप 83 जागांवर आघाडीवर आहे आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. नितीश कुमार यांचा जेडीयू 79 जागांवर आघाडीवर आहे. तेजस्वी यादव यांच्या आरजेडीने 32 जागांवर आघाडी घेतली आहे आणि चिराग पासवान यांचा एलजेपीआर 22 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि सीएमपीआयएमएल प्रत्येकी सहा जागांवर आघाडीवर आहेत. लालू प्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव हे दोघेही पिछाडीवर आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा