
Vikhroli Parksite Building demolition: मुंबईच्या विक्रोळी पार्कसाईट परिसरात मंगळवारी मुंबई महानगरपालिकेकडून धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यात आली. विक्रोळी पार्कसाईट (Vikhroli Parksite) परिसरात अनेक वर्षे जुन्या इमारती आहे. मोक्याच्या जागी असणाऱ्या या इमारतींना पालिकेने धोकादायक घोषित केले होते. या इमारतींचा पुनर्विकास (Redevelopment) केला जाणार आहे. मात्र, येथील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी पर्यायी जागा न मिळाल्यामुळे या नागरिकांना इमारती सोडण्यास नकार दिला होता. यावरुन महानगरपालिका (BMC) आणि स्थानिक रहिवांशामध्ये वाद होता. मात्र, मंगळवारी महापालिकेने सोबत मोठा पोलीस फौजफाटा आणत या इमारतीमधील नागरिकांना त्यांच्या घरातून बाहेर काढले. यावेळी काही नागरिकांनी त्याला तीव्र विरोध केला. तेव्हा नागरिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. (Vikhroli News)
सध्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इमारतीमधील रहिवाशांना घराबाहेर काढून घरांचे दरवाजे तोडायला सुरुवात केली आहे. पालिकेने आपल्यासोबत तोडकाम करणाऱ्या कामगारांची पथकेही आणली आहेत. नागरिकांनी पुन्हा या घरांमध्ये येऊन राहू नये, यासाठी तोडकाम करणाऱ्या पथकांकडून घरांचे दरवाजे तोडले जात आहेत. या कारवाईला काही स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला. या नागरिकांना बळाचा वापर करुन घरातून बाहेर काढण्यात आले असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे सध्या विक्रोळी पार्कसाईट परिसरात तणावाचे वातावरण आहे.
Vikhroli News: पालिकेच्या कारवाईला पार्कसाईटच्या रहिवाशांचा विरोध का?
या इमारतीमधील रहिवाशांनी आमचा पुनर्विकासाला विरोध नाही, पण पालिकेने आम्हाला पुन्हा घरं कधी देणार, हे सांगावे, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. मात्र, मुंबई महानगरपालिका याबाबत कोणतेही लेखी आश्वासन द्यायला तयार नाही, असे येथील नागरिकांनी सांगितले. येथील तीन इमारतींमध्ये मिळून 68 रहिवाशी आहेत. आम्हाला पुन्हा याठिकाणी घरे कधी मिळणार, हे पालिकेने लेखी द्यावे, ही आमची मागणी आहे. यापूर्वी पालिकेने याच भागातील तीन इमारती तोडल्या होत्या. तेथील नागरिकांना 36 महिन्यांत तुम्हाला याठिकाणी घरं देऊ, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता चार वर्ष झाल्यानंतरही या नागरिकांना घरं मिळालेली नाही. त्या इमारतींमधील रहिवाशी ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये सडत आहेत. पालिकेचा रेकॉर्ड आहे की, एकदा इथून माणूस गेला की, त्याला नातू झाला तरी त्याला पुन्हा पूर्वीच्या जागी घर मिळत नाही, असे येथील रहिवाशांनी सांगितले.
पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून आता वर्षाच्या मध्यात कारवाई केली जात आहेत. आम्ही आमच्या मुलांच्या शाळा आणि क्लासेससाठी फी भरली आहे. येथून निघाल्यानंतर आम्हाला पुन्हा मुलांना येथील शाळेत आणि क्लासेसमध्ये आणणे शक्य होणार नाही. त्यामुळे आम्हाला मुलांच्या शाळा संपेपर्यंत एप्रिलपर्यंतची वेळ द्यावी, अशी मागणी आम्ही केली होती. तसेच आम्हाला किती वेळात पुन्हा घरं देणार, हेदेखील पालिकेने लिहून द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली.
आणखी वाचा
आणखी वाचा