
Maharashtra Government Decision : राज्यातील आमदार खासदारांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक मिळण्यासंदर्भात सर्व मंत्रालयीन प्रशासनिक विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, कार्यालय प्रमुख शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, संस्था, मंडळे, महामंडळे, शासन नियंत्रित व तत्सम संस्थांमधील सर्व अधिकारी कर्मचारी यांना विशेष मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. विधानमंडळ सदस्य/संसद सदस्य कार्यालयास भेट देतील, त्यावेळी त्यांना संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी आदराची व सौजन्याची वागणूक द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आमदार खासदारांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकावे आणि प्रासंगिक शासकीय नियम व प्रक्रियेनुसार शक्य तेवढी तत्काळ मदत करावी, असे शासन निर्णयात म्हटले आहे.
Government Decision : …तर आमदार-खासदारांना उभे राहून अभिवादन करावे
विधानमंडळ, संसद सदस्य भेटावयास येतेवेळी व भेट संपून परत जातेवेळी अधिकाऱ्यांनी त्यांना उभे राहून अभिवादन करावे. त्यासोबतच आमदार, खासदारांना मोबाईलवर संवाद साधताना नेहमी आदरयुक्त भाषा व शिष्टाचार पाळावा, असे ही या शासन निर्णयात म्हटले आहे. क्षेत्रीय विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख यांनी अभ्यागतांच्या, नागरिकांच्या भेटीकरीता राखीव वेळेव्यतिरिक्त, त्यांच्या क्षेत्रातील विधानमंडळ सदस्य, संसद सदस्य यांची भेट आणि कामांचा आढावा याकरीता दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी दोन तासाची राखीव वेळ सुनिश्चित करून ती पूर्व प्रसिद्ध करावी, असेही त्यात म्हटले आहे.
कार्यक्रम पत्रिकेत नावे अचूक व योग्यरित्या राजशिष्टाचारानुसार छापावीत
ज्या जिल्ह्यात स्थानिक, राज्यस्तरीय, शासकीय भूमिपूजन, उद्घाटन, इत्यादीं कार्यक्रम असेल त्या जिल्हयातील सर्व केंद्रीय व राज्यातील मंत्री, राज्यमंत्री, त्या जिल्हयाचे पालकमंत्री, स्थानिक सर्वपक्षीय विधानमंडळ सदस्य, संसद सदस्य, महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष नगराध्यक्ष, सरपंच अशा लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात यावे. तसेच, निवासी उपजिल्हाधिकारी यांचेकडून खात्री करुनच कार्यक्रम पत्रिकेत त्यांची नावे अचूक व योग्यरित्या राजशिष्टाचारानुसार छापावीत असेही त्यात म्हटले आहे.
आमदारांनी कसे वागावे, कसे वागू नये हे नितीमूल्य समिती ठरणार!
विधिमंडळाच्या विविध समित्यांच्या सदस्यांचे आचरण कसे असावे, यासाठी नितीमूल्य समिती स्थापन करण्यात आली आहे. आमदार चैनसुख संचेती हे या समितीचे अध्यक्ष असून समितीने अहवाल दिल्यानंतर वर्तनाचे नियम निश्चित होणार असल्याची माहिती आहे. समितीत चैनसुख संचेतींसोबतच सुधीर मुनगंटीवार, विजय देशमुख, दीपक केसरकर, दिलीप वळसे पाटील, सुनिल प्रभू, अमिन पटेल, अमरिश पटेल, आणि रामराजे निंबाळकर समितीत असणार आहे. धुळ्यात विधिमंडळाची अंदाज समिती दौऱ्यावर असताना अध्यक्ष खोतकर यांच्या कथित पीएच्या निवासस्थानातील खोलीत 1 कोटी 80 लाख रुपये सापडले होते . ह्या घटनेनंतर खळबळ उडाली होती, सोबतच मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश देखील दिले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा