
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला दिलेल्या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केले. तटकरे यांनी संजय राऊत यांच्या टीकेला फारसे महत्त्व दिले नाही, तर विजय वडेट्टीवार यांच्यावर तीव्र शब्दांत प्रहार केला. वडेट्टीवारांना आमच्या पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी प्रथम चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर निवडून आणण्याचे आव्हानही दिले.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय जनतेने मान्य केला असून, आम्ही महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी भाजपासोबत सत्तेत आहोत, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. शरद पवारांनी उल्लेखलेल्या विलीनीकरणाच्या चर्चांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, कुठल्या पक्षाचे कुणा पक्षात विलीनीकरण होणार हे स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र बाण्याचा असून, आमचे निर्णय आम्हीच घेतो, असेही अधोरेखित केले.