
मुंबई एअरपोर्टच्या धावपट्टीवर इंडिगो आणि एअर इंडियाच्या दोन विमानांचे पंख एकमेकांना धडकल्याची घटना घडली आहे. लँडिंगच्या वेळी ही घटना घडली, ज्यामुळे मुंबईत एक मोठी विमान दुर्घटना टळली. या दोन्ही विमानांमध्ये प्रवासी उपस्थित होते, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कुणीही जखमी झाले नाही.
डीजीसीए (नागरिक हवाई वाहतूक महासंचालनालय) ने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, दोन्ही विमान कंपन्यांना या संदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, इंडिगोचे विमान लँड झाल्यानंतर टॅक्सीवरून जात असताना दुसऱ्या टॅक्सीवरून येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानाला त्याचा पंख घासला गेला. हा एक छोटा अपघात म्हणून पाहिला जात आहे. विमानांच्या पंखांमध्ये आणि खालच्या बाजूला इंधन असते, त्यामुळे हा प्रसंग गंभीर रूप धारण करू शकला असता.
हा प्रकार सायंकाळी साडेसात ते पावणेआठच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. या घटनेचे काही फोटोही समोर आले आहेत, जे ही परिस्थिती दर्शवतात.