
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांकडून संशय व्यक्त केला जात असून या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे. खासदार बजरंग सोनावणे यांनी दादांच्या विमानात बॉम्ब होता का?, याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनीही या अपघाताबाबत शंका उपस्थित होत असतील, तर चौकशी हाच एकमेव मार्ग असल्याचं मत व्यक्त केलं आहे. सध्या या विमान अपघाताची चौकशी सीआयडीकडून सुरू असून ब्लॅक बॉक्समधील माहिती काढण्याचं कामही सुरू आहे. दरम्यान, दादांच्या अपघाती मृत्यूवर कोणीही राजकारण करू नये, असं आवाहन मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही या अपघातावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दादांच्या कुटुंबीयांना आणि सहकाऱ्यांना मनात शंका असतील, तर त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेतृत्वाला वेदना होण्याचं कारण काय?, असा सवाल राऊत यांनी केला आहे.
या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. राऊत यांना बडबड करण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नसते. त्यांना दुसरं काही कामधंदा उरलेला नाही, अशी टीका दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना केली. तसेच मुख्यमंत्री अशा निराधार वक्तव्यांना उत्तर देत नसल्याचंही दरेकर यांनी स्पष्ट केलं.