
खेळाडूंना जबर झटका! बीसीसीआयचा टी20 वर्ल्डकप दरम्यान मोठा निर्णय, आता तसं काही नाहीImage Credit source: BCCI Twitter
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय दरवर्षी खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर आकलन करून वार्षिक करार जाहीर करत असते. काही खेळाडूंना करारात समाविष्ट केलं जातं, तर काही खेळाडूंची गच्छंती होती. यंदा बीसीसीआयने 30 खेळाडूंचा करारात समावेश केला आहे. यात फक्त तीन श्रेणींचा समावेश केला आहे. त्यामुळे खेळाडूंना आश्चर्याचा धक्का बसला असणार यात काही शंका नाही. ए, बी, सी अशा ग्रेड जाहीर करण्यात आल्या आहेत. यातून ए+ ही ग्रेट काढण्यात आली आहे. यात विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. आता ही ग्रेड नाही. त्यामुळे खेळाडूंना आर्थिक फटका बसला हे नक्की झालं आहे. कारण ए+ ग्रेडमध्ये असलेल्या खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रूपये मिळत होते.
बीसीसीआयच्या नव्या वार्षिक करारानुसार, ए ग्रेड ही सर्वोत्तम असणार आहे. यात यंदा फक्त तीन खेळाडूंचा समावेश आहे. कर्णधार शुबमन गिल, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना स्थान दिलं आहे. ए ग्रेडमधील या खेळाडूंना वार्षिक रक्कम म्हणून 5 कोटी मिळणार आहेत. तर विराट कोहली आणि रोहित शर्मा गेल्या काही वर्षांपासून ए+ ग्रेडमध्ये समाविष्ट होते. पण आता त्यांची गच्छंती झाली असून त्यांना बी ग्रेडमध्ये समाविष्ट केलं आहे. त्यांना 3 कोटी रूपये मिळणार आहे. म्हणजेच मागच्या वर्षीच्या तुलनेत थेट 4 कोटींची फटका बसला आहे.
🚨 News 🚨
BCCI announces Annual Player Retainership for Team India Senior Men and Senior Women for the 2025-26 season#TeamIndia | Details 🔽https://t.co/Rd3pUCPRr9 pic.twitter.com/UNYRThs1kW
— BCCI (@BCCI) February 9, 2026
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी मागच्या महिन्यातच या ग्रेडबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं. की, या वर्षी वार्षिक करारात कोणताही खेळाडू ए+ ग्रेडमध्ये समाविष्ट केला जाणार नाही. कारण सर्व फॉर्मेट खेळणारे खेळाडू खूपच कमी आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली फक्त वनडे खेळतात. तर रवींद्र जडेजा कसोटी आणि वनडेत खेळतो. भारतीय संघाची सध्याची स्थिती पाहता कोणताही खेळाडू तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळत नाही. सामन्यांची संख्या पाहता तसं शक्य होईल असंही वाटत नाही.