
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला असून, या घटनेनंतर राज्यभरात विविध अफवा आणि चर्चा सुरू झाल्या होत्या. काही जण विमानात पाचच जण होते, तर काहीजण सहावी व्यक्ती अजित पवारच असल्याचे सांगत होते. अजित पवार अजूनही जिवंत आहेत, असे दावेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात केले जात होते. या सर्व चर्चांमुळे पवार कुटुंबातील सदस्य आणि आमदार रोहित पवार यांनी 10 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन सर्व बाबी स्पष्ट करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अजित पवार यांचा विमान अपघात झाला असून ते आता आपल्यात नाहीत, असे स्पष्टपणे सांगितले. रोहित पवार म्हणाले की, अजितदादा रोज घड्याळ घालत असत. अपघातानंतर जे घड्याळ सापडले, ते पाहूनच मला दादांचा मृत्यू झाल्याची खात्री झाली. ते घड्याळ 15 मिनिटे पुढे असायचे आणि अपघाताच्या वेळी ते 9 वाजता थांबले होते. ते पुढे म्हणाले की, अपघातानंतर अनेक दिवस मला वाटत होते की हे फक्त एक वाईट स्वप्न आहे. पण दादांचा जळलेला स्वेटर, चप्पल आणि घड्याळ पाहिल्यानंतर सत्य स्वीकारावे लागले. रोहित पवार यांनी सांगितले की, आम्ही सरकारमध्ये नसतानाही जेवढी माहिती मिळू शकली तेवढी गोळा केली, कारण लोकांना नेमके काय घडले हे समजणे आवश्यक होते. आज अजितदादा आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांनी ते कायम आपल्या सोबत राहतील, असेही त्यांनी म्हटले.