Headlines

लग्नासाठी गावी गेले, पेस्ट कंट्रोलसाठी बहिणीकडे चावी दिली, पण घराचा दरवाजा उघडताच… डोंबिवलीत काय घडलं?

लग्नासाठी गावी गेले, पेस्ट कंट्रोलसाठी बहिणीकडे चावी दिली, पण घराचा दरवाजा उघडताच… डोंबिवलीत काय घडलं?
लग्नासाठी गावी गेले, पेस्ट कंट्रोलसाठी बहिणीकडे चावी दिली, पण घराचा दरवाजा उघडताच… डोंबिवलीत काय घडलं?


गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली शहरात घरफोडीच्या घटना घडताना दिसत आहे. त्यातच आता चोरट्यांनी भरवस्तीतील बंद घरांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. देसलेपाडा परिसरातील आर.पी. रेसीडेन्सीमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाच्या बंद घर फोडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४० तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, देसलेपाडा येथील आर.पी. रेसीडेन्सीमध्ये अशिष रामधनी यादव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. ते त्यांच्या कुटुंबासह उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी एका लग्नसमारंभासाठी सहकुटुंब गेले होते. यावेळी घराच्या सुरक्षेसाठी त्यांनी घराची चावी आपली बहीण मायादेवी (रा. सोनारपाडा) यांच्याकडे सोपवली होती. त्यांच्या घरात ९ फेब्रुवारीला पेस्ट कंट्रोलचे काम करण्यात आले होते. त्यानंतर घर व्यवस्थित लॉक करण्यात आले होते.

यानंतर १५ फेब्रुवारी रोजी घराच्या वॉटर फिल्टरची दुरुस्ती करण्यासाठी तंत्रज्ञ येणार होता. त्यासाठी मायादेवी आणि त्यांचे पती दुपारी १ च्या सुमारास अशिष यांच्या घरी गेले. यावेळी त्यांना घराचे सेफ्टी डोअर आणि मुख्य दरवाजाची कडी तुटलेली अवस्थेत दिसली. त्यांनी आत प्रवेश केला असता दोन्ही बेडरूममधील कपाटे उघडी होती. तसेच लॉकर तोडलेले होते. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते.

या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या बहिणीने अशिष यादव यांना याबद्दलची माहिती दिली. प्राथमिक अंदाजानुसार, कपाटात ठेवलेले साधारण ४० तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी पळवून नेली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या धाडसी चोरीमुळे पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

घरफोडीचा गुन्हा दाखल

या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून संशयितांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान आता लग्नसराई आणि सुट्ट्यांच्या काळात घर बंद ठेवून बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी अतिरिक्त सुरक्षा बाळगावी. तसेच मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *