
रोहित पवार यांनी विखे पाटलांना सुनावलं
राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. मात्र हा अपघात नसून त्यात घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्यावरूनच अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. रोहित पवार यांनी अनेक पत्रकार परिषदा घेऊन या अपघाताच्या आदल्या दिवशीच्या घटना, तसेच विमानातील काही गोष्टी, काही त्रुटी निदर्शनास आणऊन दिल्या, पुरावेही सादर केले. मात्र यावर राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल टीका केली होती. रोहित पवार अपघाताचे राजकारण करत असून लोकांचा बुद्धिभेद करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी रोहित पवारांवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यांच्या या टीकेवर रोहित पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
रोहित पवार यांनी गेल्या आठवड्यात मुंबई व दिल्लीत तसेच काल (18 फेब्रुवारी) मुंबईत पुन्हा पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबात अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ब्लॅक बॉक्स, विमानातील इंधन तसेच व्हीएस कंपनीशी सत्तेतल्या काही लोकांची जवळीक अशा अनेक मुद्यांवर रोहित पवार यांनी भाष्य केलं होतं. मात्र त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर विखे पाटील यांनी रोहित पवारांवर बोचरी टीका केली. काही लोक दुःखात आधार देण्याऐवजी लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोण काय म्हणते, याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. हा स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले होते. त्यांच्या याच टीकेवर रोहित पवार यांनी एका पोस्टमधून प्रत्युत्तर दिले.
रोहित पवार यांची पोस्ट काय ?
अजित पवारांचे पुतणे, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी त्यांच्या X ( पूर्वीच ट्विट) अकाऊंटवर एक पोस्ट लिहीली आहे. काठावर बसून त्यांना आमच्या दुःखाची धग कळणार नाही, असं रोहित पवार यांनी यात म्हटलं आहे.
रोहित पवार यांची पोस्ट जशीच्या तशी..
” ज्येष्ठ नेते विखे-पाटील साहेब यांनी केलेलं विधान अत्यंत क्लेशदायक, आश्चर्यकारक आणि बेजबाबदार आहे. अजिदादांसारखा दुर्दैवी प्रसंग कधीच कुणाच्याही कुटुंबावर ओढवू नये… वेदना काय असते ती ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अजितदादांच्या अपघाताच्या विषयावर मी राजकारणाचा ‘र’ शब्दही उच्चारला नसताना विखे पाटील साहेब ओढून ताणून या विषयाला राजकारणाशी जोडून विमान अपघाताच्या चौकशीला वेगळं वळण तर देत नाहीत ना? काठावर बसून त्यांना आमच्या दुःखाची धग कळणार नाही, त्यामुळं त्यांनी किमान या विषयाला वेगळे फाटे तरी फोडू नयेत, अशी माझी त्यांना विनंती आहे” असं रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
ज्येष्ठ नेते विखे-पाटील साहेब यांनी केलेलं विधान अत्यंत क्लेशदायक, आश्चर्यकारक आणि बेजबाबदार आहे. अजिदादांसारखा दुर्दैवी प्रसंग कधीच कुणाच्याही कुटुंबावर ओढवू नये… वेदना काय असते ती ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अजितदादांच्या अपघाताच्या विषयावर मी राजकारणाचा ‘र’ शब्दही उच्चारला…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 18, 2026
काय म्हणाले होते विखे-पाटील ?
काल राधाकृष्ण विखे पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथे बोलत होते. ” या (अजित पवार विमान अपघात) प्रकरणात CBI चौकशीची मागणी करण्यात आली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही DGCI (डायरेक्टर जनरल ऑफ क्राईम इन्व्हेस्टिगेशन) यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. आता वेगवेगळ्या गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय, हे योग्य नाही. अशा दुर्दैवी घटनेवर राजकारण करणे हे अधिक दुर्दैवी आहे. सत्य जे आहे ते समोर येईलच. या प्रकरणाचे राजकारण करू नये” असं ते म्हणाले होते.
” ही घटना मोठी आणि वेदनादायक घटना आहे. त्याचं सगळ्यांनाच दुःख झालं आहे. मात्र काही लोक दुःखात आधार देण्याऐवजी लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोण काय म्हणतंय याला फार महत्त्व द्यायला नको. हा सगळा सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार आहे. माझी रोहित पवारांना सूचना आहे की, त्यांनी आरोप करणं, भानगडी बंद कराव्यात. कुटुंबावर दुःखाचा आघात झाला आहे, त्यामध्ये राजकारण कशाला करता?” असा सवाल विचारत विखे पाटील यांनी रोहित पवारांवर टीका केली होती.