
डोंबिवली शहरातील आयरेगाव परिसरातील टावरी पाड्यात सध्या भीषण पाणीटंचाईने नागरिकांचे जगणे कठीण केले आहे. दररोजच्या पाण्यासाठी महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.पाणी विकत घेण्यासाठी तब्बल २०० रुपये मोजावे लागत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.डोंबिवली स्मार्ट सिटीची घोषणा करण्यात आली परंतू स्मार्ट सिटी तर काही झाली नाही,परंत मूलभूत गरजांकडे आता दुर्लक्ष होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
डोंबिवली शहरातील आयरेगाव परिसरातील टावरी पाडा परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. नियमित पाणीपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना दररोज पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सकाळी कामावर जाण्याआधी महिला आणि ज्येष्ठ नागरिक पाण्यासाठी रांगा लावताना दिसत आहेत.परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, अनेक कुटुंबांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. खाजगी रिक्षा किंवा सायकलच्या माध्यमातून पाणी आणण्यासाठी नागरिकांना सुमारे २०० रुपये खर्च करावे लागत आहेत.
नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
पाण्यासाठी या वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडले असून लोकप्रतिनिधींविरोधात संताप वाढू लागला आहे.डोंबिवलीसारख्या सुशिक्षित शहरात गाव-खेड्यांसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पाण्या अभावी घरगुती कामे, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील स्थानिक नगरसेवक मंदार टावरे यांनी काही भागात काही अडचणींमुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याचे मान्य केले आहे.
स्मार्ट सिटीचे दावे हवेत विरले
नवीन अधिक क्षमतेचे जलकुंभ उभारणे आणि अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घ्यावे लागणार असून लवकरच सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन नगरसेवक मंदार टावरे यांनी दिले आहे.मात्र, या परिसरातील अनधिकृत चाळींना पाणी पुरवठा होत असून अधिकृत इमारतींना नियमानुसार पाणीपुरवठा न केल्याने समस्या अधिक तीव्र झाल्याचेही समोर येत आहे. नागरिकांनी केवळ आश्वासन नको, तर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक करीत आहेत. स्मार्ट सिटीचे दावे हवेत विरले असून आता साध्या मूलभूत सुविधांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
तर पाणी समस्या दूर होईल
२००५ ते २०१५ दरम्यान आयेर गाव दीड लाख लिटर क्षमतेची टाकी होती. आम्ही १५ लाख लिटर जलकुंभ निर्माण केला.अडीच कोटीचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे आहिरे गावातील पाण्याचा प्रश्न ९० ते ९५ टक्के मार्गी लागला आहे. आता आयेर गावातील भोपरला लागून आणि नांदिवलीला लागून असलेल्या काही भागात पाणी कनेक्शन झालेले नाही. तेथे लोकांना लांबून पाणी आणावे लागत आहे. साल २०१५ पर्यंत केवळ २०० ते २५० नळजोडण्या होत्या. आज घडीला १६५० अधिकृत पाणी कनेक्शन आहेत. अलिकडे सहा इंचाची नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. इंटर्नल नेटवर्क चांगले झाले की पाणी समस्या दूर होईल असे स्थानिक भाजपा नगरसेवक मंदार टावरे यांनी म्हटले आहे.