
Aiden Markram and Suryakumar Yadav WI vs SA Super 8 ScenarioImage Credit source: ProteasMenCSA X Account
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत गुरुवारी 26 फेब्रुवारीला वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. उभयसंघात सुपर 8 फेरीतील होणारा हा सामना टीम इंडियासाठीही फार महत्त्वाचा असणार आहे. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकल्यास भारताचं सेमी फायनलचं समीकरण काही अंशी सोपं होण्यास हातभार लागेल. मात्र वेस्ट इंडिजने हा सामना जिंकल्यास टीम इंडियाच्या अडचणीत वाढ होईल. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याच्या निकालाकडे क्रिकेट वर्तुळासह भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तसेच या सामन्यानंतर टीम इंडिया सुपर 8 मधील आपल्या दुसऱ्या सामन्यात झिंबाब्वे विरुद्ध भिडणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी गुरुवार आव्हानात्मक ठरणार आहे.
ए ग्रुपमधून दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघांनी सुपर 8 फेरीतील आपला पहिलाच सामना जिंकला. विशेष म्हणजे दोन्ही संघांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने भारतावर 76 तर धावांनी मात केली. तर विंडीजने झिंबाब्वेवर 100 पेक्षा अधिक धावांनी विजय साकारला. त्यामुळे दोन्ही संघांचा नेट रनरेट चांगला झाला आहे. तर इथे भारत आणि झिंबाब्वे यांच्या नेट रनरेटवर मोठ्या पराभवामुळे परिणाम झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाला सुपर 8 फेरीतील उर्वरित 2 सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. तसेच टीम इंडियाला उपांत्य फेरीसाठी दक्षिण आफ्रिकेचीही मदत लागणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने विंडीजला पराभूत करत टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वातील सलग सहावा विजय मिळवून आपल्याला उपांत्य फेरीसाठी मदत करावी, हीच आशा आता भारतीय चाहत्यांची आहे. त्यामुळे गुरुवारी विंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचा निकाल काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं समीकरण काय?
टीम इंडियाला सुपर 8 मधील आपले उर्वरित 2 सामने जिंकावे लागतील. तसेच दक्षिण आफ्रिकेने सुपर 8 मध्ये विंडीज आणि त्यानंतर झिंबाब्वेवर विजय मिळवला तर टीम इंडिया सहज उपांत्य फेरीत पोहचेल. मात्र असं झालं नाही तर काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
तसेच विंडीजने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं तरीही टीम इंडिया सेमी फायनलपर्यंत पोहचू शकते. मात्र त्या परिस्थितीत समीकरण आणखी जर तरचं होईल. विंडीजनंतर दक्षिण आफ्रिकेचा सामना हा झिंबाब्वे विरुद्ध होणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका विंडीजनंतर झिंबाब्वे विरुद्ध पराभूत झाली तर त्यांच्या खात्यात 2 गुणच राहतील. तसेच टीम इंडियाने 2 सामने जिंकल्यास एकूण 4 गुण होतील. झिंबाब्वेने या स्पर्धेत साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला पराभूत केलं आहे. त्यामुळे झिंबाब्वे दक्षिण आफ्रिका पराभूत करण्यात यशस्वी ठरणार नाही असं गृहीतही धरता येणार नाही. त्यामुळे विंडीज-दक्षिण आफ्रिका सामना अतिशय निर्णायक ठरणार आहे.