
सध्या अमेरिका-इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षाचे पडसाद भारतात उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. जागतिक राजकारणासाठी ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना असल्याचे राऊत यांनी म्हटले. मध्यपूर्व आशियातील स्थैर्यासाठी हा संघर्ष घातक ठरू शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. इराणचे कमजोर होणे भारतासाठीही धोकादायक असल्याचे नमूद करत, ज्या पद्धतीने अमेरिका आणि इस्त्रायल इराणवर प्रभाव वाढवत आहेत, त्याचे परिणाम भविष्यात भारतावरही होऊ शकतात, असे वक्तव्य त्यांनी केले.
भारत हा एक महान देश असून कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही, असे सांगतानाच राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेबरोबर केलेल्या व्यापार करारामुळे भारत अमेरिकेच्या प्रभावाखाली गेला असल्याचा आरोप त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर भारताने स्वायत्त आणि ठाम परराष्ट्र धोरण अवलंबण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.