
इराण आणि इस्त्राईल यांच्यातील वाढत्या युद्धामुळे जागतिक परिस्थिती गंभीर बनली आहे. हे युद्ध आता जवळपास 12 ते 15 देशांपर्यंत पोहोचले आहे, ज्याचा फटका हज यात्रेसाठी गेलेल्या भारतीय मुस्लिम बांधवांनाही बसला आहे. महाराष्ट्रातील येवला शहरातील सहा हजयात्री मक्का येथे अडकले आहेत. यात कुटुंबातील पुतण्या, भाऊजु, सून आणि तीन मुलांचा समावेश आहे.
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, मक्का आणि मदिना येथे स्थानिक प्रशासनाने त्यांची राहण्याची व सुरक्षिततेची उत्तम व्यवस्था केली आहे, त्यामुळे ते सध्या सुरक्षित आहेत. मात्र, युद्धामुळे विमानसेवा बंद असल्याने त्यांच्या मायदेशी परतण्याबाबत चिंता आहे. कुटुंबाने भारत सरकारकडे तातडीने लक्ष घालण्याची आणि त्यांना लवकरात लवकर महाराष्ट्रात परत आणण्याची मागणी केली आहे. हज यात्रेसाठी गेलेल्या सर्व भाविकांना सुरक्षित परत आणण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी मुस्लिम बांधवांकडून केली जात आहे.