
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य घोषित केले आहे. या मोहिमेत तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वापरला जाईल, असे त्यांनी सांगितले. 33% वनक्षेत्राचे लक्ष्य गाठण्यासाठी कृषी-हवामान परिस्थिती, मातीचा प्रकार आणि वृक्षांचे प्रकार या सर्वांचा सखोल अभ्यास केला जाईल. लागवडीचे वैज्ञानिक पद्धतीने ट्रॅकिंग केले जाईल. या प्रक्रियेत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, कंपन्या, तंत्रज्ञ आणि अर्बोरिस्ट यांना सहभागी करून घेतले जात आहे. भविष्यात स्टार्टअप्सनाही या मोहिमेत समाविष्ट केले जाईल.
मुंबईतील विकास प्रकल्पांमुळे खारफुटीची कत्तल होत असल्याच्या प्रश्नावर बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केले की, राज्यात खारफुटी संरक्षणासाठी अत्यंत कठोर कायदे आहेत. उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय एकही खारफुटी तोडता येत नाही. आवश्यक ठिकाणी प्रकल्पामुळे खारफुटी तोडण्याची वेळ आल्यास, पर्यायी खारफुटी उद्याने (Compensatory Mangrove Parks) तयार केली जातात. महाराष्ट्राने खारफुटीचे आवरण वाढवले आहे आणि ते कमी होऊ दिलेले नाही, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर नुकतीच झालेली दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद अत्यंत महत्त्वाची ठरली, असेही त्यांनी नमूद केले.