
भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत असे म्हटले आहे की, जगामध्ये भारताची स्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चांगली आहे, तर राऊत यांनी स्वतःच्या आणि पक्षाच्या स्थितीचा विचार करावा. भारत अमेरिकेचा गुलाम नाही, उलट राऊत सिल्व्हर ओक आणि सोनिया गांधी-राहुल गांधींचे गुलाम आहेत. शरद पवारांच्या घरी सेवा करणाऱ्यांनी मोदीजींवर टीका करू नये, असंही बन म्हणाले.
पुढे बोलताना नवनाथ बन यांनी म्हंटलं की, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. ते अडीच वर्षांत अडीच दिवसही मंत्रालयात आले नाहीत, असा दावा केला आहे. त्यांच्या काळात विकासाची एकही कामे झाली नाहीत, उलट महाविकास आघाडी सरकारने मुंबई मेट्रो थांबवण्याचे पाप केले. त्यामुळे जनतेने त्यांना निवडणुकीत घरी बसवले, अशी टीका केली.
लोकसभेचे कामकाज चालवण्यासाठी ओम बिर्ला सक्षम आहेत. इंडी आघाडीची परिस्थिती बिघडल्यामुळे ते अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे अस्तित्व संपल्याप्रमाणेच इंडी अलायन्सचेही अस्तित्व संपले आहे. ओम बिर्ला समर्थपणे लोकसभा चालवत असून, राऊत यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्याचा काही परिणाम होणार नाही, असाही विश्वास बन यांनी व्यक्त केला आहे.