
हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. उष्णता अधिक तीव्र होत असतानाच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज वर्तवला. राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. मार्च महिन्यातही अवकाळी पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. 20 मार्च 2026 पर्यंत राज्यावर अवकाळीचे संकट कायम असणार आहे. शेतकऱ्यांकडून रब्बीचे पिक काढले जात असतानाच अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हवामानात मोठे बदल बघायला मिळतील. भारतीय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला. यासोबतच काही भागात उष्णता अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. कोकणात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मागील काही दिवसांपासून अनेक शहरात पारा 40 पार जाताना दिसत आहे. त्यामध्येच पावसाचा इशारा देण्यात आल्याने उष्णतेपासून थोडा दिलासा मिळेल.
धाराशिव, बीड, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. आजही तापमानात चढउतार बघायला मिळेल. जळगाव, वाशिम, चंद्रपूर येथे पारा 40 अंशाच्या पुढे होता. निफाड येथे राज्यातील निचांकी तापमानाची नोंद झाली.
निफाड येथे 13.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील काही भागात कडाक्याचे उष्ण आहे तर काही भागात पाऊस हजेरी लावणार आहे. पुढील काही दिवस राज्यात पाऊस कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि आता मार्च महिन्यातही पाऊस होत आहे. देशातील अनेक राज्यात पाऊस पडत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून उष्णतेची तीव्रता आता अधिक जाणवू लागली आहे. कडक उन्हामुळे नंदुरबार शहरातील नेहमी गजबजलेले मुख्य रस्ते सध्या ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मार्च महिन्यातच नागरिकांना मे महिन्यातील उकाड्याचा अनुभव येत असल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मिळून 17 उष्माघात कक्ष तयार करण्यात आले आहेत.