
आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांची अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेनुसार पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात निवडणुका होणार आहेत. या सर्व राज्यातील निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी लागणार आहे. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, केरळ आणि आसाममध्ये 9 एप्रिलला निवडणूक होणार आहे. आसाममध्ये निवडणुका एका टप्प्यात पार पडतील, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदान दोन टप्प्यात होणार असून, 23 एप्रिल आणि 29 एप्रिलला मतदान होईल. पुद्दुचेरीमध्ये 9 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर तामिळनाडूत मतदान 23 एप्रिल रोजी होईल. याशिवाय, महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती या मतदारसंघांमध्ये 23 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. या दोन्ही पोटनिवडणुकांचा निकाल 4 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सर्व राज्यांमध्ये सुरक्षित आणि पारदर्शक मतदान सुनिश्चित करण्यासाठी तयारी पूर्ण असल्याचे सांगितले आहे.