
गेल्या एक महिनाभरापासून राज्यात भोंदूबाबा प्रकरणाने खळबळ माजली आहे. लिंगपिसाट अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करुन त्यांच्यावर बलात्कार केला. आता अशोक खरात विरोधात जवळपास 13 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर खरातचे राजकीय वर्तुळातील अनेक बड्या व्यक्तींशी संबंध असल्याचे समोर आले होते. सध्या अशोक खरात प्रकरणी चौकशी सुरु असून दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आता या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील कार्यालयाचे उद्घाटन आज शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पक्षाला अनेक वर्षांनंतर स्वतंत्र कार्यालय मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर आपली पहिली स्पष्ट प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, “राज्यात काय चाललंय? खरात बाबत बोलताना महिलांचे कान टोचले. त्याच्या सोबत असलेली कोणती महिला आपल्याला बेशुद्ध वाटते, मात्र महिलांना कळायला पाहिजे आपण काय करतो.”
शर्मिला ठाकरे यांनी यावेळी एक नवीन खुलासाही केला. त्यांनी सांगितले की, जेव्हा मनसेचे १३ आमदार निवडून आले होते, त्यावेळी अनेक बाबा भेटायला आले होते. “त्यावेळी आम्ही स्पष्ट सांगितले की, आम्ही त्यांच्या पाया पडणार नाही. या भेटा आणि जा,” असे आम्ही त्यांना सांगितले होते.
इंग्रजी सक्तीवर संताप
कार्यक्रमात शर्मिला ठाकरे यांनी नवी मुंबई महापालिकेने सर्व शाळा इंग्रजी माध्यमात करण्याचा ठराव मंजूर केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. “मराठी शिकवा, असे सांगायला आपल्याला लाज वाटली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी त्या त्या ठिकाणची भाषा शिकवली जाते, मग आपल्याकडेच असे का होते?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात आवाज उठवल्याची आठवण करुन दिली आणि सरकारला तो निर्णय मागे घ्यावा लागला असे देखील म्हटले.