
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. सध्या सुनेत्रा पवार या प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत. या निवडणुकीच्या प्रचार पवार कुटुंबाकडून करण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना बारामती पोटनिवडणुकीबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. आज तुम्हाला मोदी आणि शाहांनी उभं केलं असेल पण जर पवारांनी जर बारामती उभी केली नसती तर त्यापुढच्या कोणत्याही पवारांना महाराष्ट्रात कोणतेच स्थान मिळाले नसते, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
संजय राऊत काय म्हणाले?
शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का, तुम्ही कितीही मोठे झालात, अजित पवार, सुप्रिया सुळे, त्यांचे चिरंजीव असतील. तुम्ही आज राजकारणात पवार म्हणून उभे आहात, ते शरद पवारांमुळे आहात. याचा विसर पडता कामा नये. तुम्ही कोण आहात किंवा आम्ही कोण आहोत, आम्ही सर्व ठाकरे या नावामुळे आहोत. कारण ठाकरे या नावाला वैभव आणि गौरव हा बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण करुन दिला. तेच नसते तर आम्ही काय, तुमच्या पूर्वजांनी तुमच्या आडनावाला जे वलय निर्माण करुन दिले आहे. बारामती म्हणजे शरद पवार हे लक्षात घ्या. आज तुम्हाला मोदी आणि शाहांनी उभं केलं असेल पण जर पवारांनी जर बारामती उभी केली नसती तर त्यापुढच्या कोणत्याही पवारांना महाराष्ट्रात कोणतेच स्थान मिळाले नसते, असे संजय राऊत म्हणाले.
बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना उभी केली नसती आणि कष्ट केले नसले, तर आम्हा सर्वांना राज्यात काहीच करता आले नसतं. त्यामुळे माणसाने किमान कृतज्ञता ठेवायला हवी. शरद पवारांची पुण्याई पाठीशी आहे. तुम्ही कितीही नाही म्हटलं, कितीही टाळण्याचा प्रयत्न केला, तरी पवारांची पुण्याई आहेच. निवडणूक जय पराजय होतच असतो. पवार म्हणजे शरद पवार दुसरं कोणीही नाही. त्यांचीच पुण्याई बारामतीसह सर्वत्र आहे. त्यांचा प्रचार करायचा की नाही हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे, असे संजय राऊतांनी सांगितले.
सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्रिपद मिळणार का?
हे फक्त एका निवडणुकीपुरती आहे. पुढची निवडणूक बिनविरोध होणार नाही. ही निवडणूक आम्ही अजित दादांना श्रद्धांजली म्हणून पाहत आहोत. अजित दादांना मुख्यमंत्री होता आलं नाही, जर सुनेत्रा पवारांना भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर तो भाजपचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस जर त्यांचा वारसदार म्हणून एकनाथ शिंदे ऐवजी सुनेत्रा पवारांची निवड करतात की काय, असं मला जाणवत आहे, असेही त्यांनी म्हटले.