
मागच्या आठवड्यात इराण आणि अमेरिकेत सीजफायरची घोषणा झाली. सगळ्याच जगाचीच ही इच्छा होती. कारण मध्य पूर्वेतील इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे तेल संकट निर्माण झालय. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना याचा फटका बसतोय. तेलाच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे हे युद्ध थांबावं अशीच सर्वांची इच्छा होती. तसं घडलं सुद्धा. शनिवार पासून पाकिस्तानात सुरु झालेली शांतता कराराची चर्चा यशस्वी होईल असं वाटलेलं. पण असं झालं नाही. अमेरिकेचे राष्ट्रपती जेडी वान्स यांनी शांतता वाटाघाटी अपयशी ठरल्याच सांगितलं. त्यामुळे पुन्हा एकदा हे युद्ध सुरु होण्याचा धोका वाढलेला आहे. पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी घडवत होता.
दरम्यान शांतता चर्चा फेल झाल्यानंतर पाकिस्तानने आता एक मोठं पाऊल उचललं आहे. पाकिस्तानचे जवळपास 13 हजार सैनिक आणि 10 ते 18 फायटर जेट्स सौदी अरेबियात दाखल झाले आहेत. सौदी सरकारने स्वत: 11 एप्रिलला पाकिस्तानी सैनिक किंग अब्दुलअजीज एअर बेसवर पोहोचल्याची घोषणा केली होती. सोबत पाकिस्तानी एअर फोर्सची विमानं सुद्धा होती. मागच्यावर्षी पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये एक करार झाला आहे. त्यानुसार एका देशावरील हल्ला हा दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. त्यामुळे पाकिस्तानने इराण विरुद्ध युद्धात उतरण्यासाठी हे पाऊल उचललय का? असा प्रश्न निर्माण होतो.
फायटर जेट्स आणि सपोर्ट एअरक्राफ्ट सुद्धा पाठवले
सौदी अरेबियात पाकिस्तानचे 10 हजार सैनिक आधीपासूनच तैनात आहेत. आता ही संख्या 23 हजार झाली आहे. पाकिस्तानने 10 ते 18 फायटर जेट्स आणि सपोर्ट एअरक्राफ्ट सुद्धा पाठवले आहेत. पाकिस्तान सरकारच्या अधिकाऱ्याने याची पृष्टी केली. दोन्ही देशांमध्ये सैन्य सहकार्य वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलय. दोन्ही देशांच्या सैन्याने चांगला समन्वय राखून काम करावं असा उद्देश आहे.
दोन्ही देश अजून जवळ आले
पाकिस्तान आणि सौदी अरेबियाचे संबंध खूप जुने आणि मजबूत आहेत. पाकिस्तानने याआधी सुद्धा सौदीला सैन्य मदत केली आहे. 1991 च्या गल्फ युद्धाच्यावेळी सुद्धा पाकिस्तानने सौदीला सैनिक पाठवले होते. 2025 साली दोन्ही देशांमध्ये डिफेन्स पॅक्ट झाला. त्यामुळे दोन्ही देश अजून जवळ आले आहेत.
एक सौदीचा नागरिक मारला गेला
इराणने सौदीच्या ऊर्जा ठिकाणांवर हल्ला केला. त्यात एक सौदीचा नागरिक मारला गेला. त्यामुळे सौदीने आपली सुरक्षा मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केलय. पाकिस्तानी सैन्याची तैनाती ही कुठल्या हल्ल्यासाठी नाही तर बचाव आणि सहकार्यासाठी झाल्याचं दोन्ही देशांनी स्पष्ट केलय.